लघु, सुक्ष्म का असेना पण नारायणराव आपण केंद्रीय मंत्री आहात, उद्धव ठाकरेंचा चिमटा

| Updated on: Oct 09, 2021 | 3:36 PM

नारायण राणे यांना मिळालेल्या खात्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना जोरदार चिमटा काढला. नारायणराव, लघु सुक्ष्म का असेना पण आपण केंद्रीय मंत्री आहात, असा चिमटा त्यांनी राणेंना काढला.

लघु, सुक्ष्म का असेना पण नारायणराव आपण केंद्रीय मंत्री आहात, उद्धव ठाकरेंचा चिमटा
उद्धव ठाकरे आणि नारायण राणे
Follow us on

मुंबई : नारायण राणे यांना मिळालेल्या खात्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना जोरदार चिमटा काढला. नारायणराव, लघु सुक्ष्म का असेना पण आपण केंद्रीय मंत्री आहात, असा चिमटा त्यांनी राणेंना काढला. मुख्यमंत्र्यांअगोदर राणेंनी जोरदार भाषण करत उद्घाटनाचा कार्यक्रम गाजवला. मुख्यमंत्र्यांनी राणेंचा एक ना एक शब्द कान देऊन ऐकला आणि आपल्या भाषणाची वेळ येताच त्यांनी राणेंचा सगळा हिशेब व्याजासकट चुकता केला.

“लघु, सुक्ष्म का असेना पण नारायणराव आपण केंद्रीय मंत्री आहात”

“आपण केंद्रात मंत्री आहात. लघू का असेना, सुक्ष्म का असेना पण मोठं खातं आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राला नक्की करुन द्याल ही तुमच्याकडून मला अपेक्षा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. कडूपणा जाऊन गोडपणा जावा, अशी अपेक्षा नारायण राणेंनी आपल्या भाषणात व्यक्त केली होती. यावरही मुख्यमंत्र्यांना राणेंना चिमटा काढला. पेड्यातला गोडपणा अंगी बाळगावा लागतात, असं म्हणत त्यांनी राणेंवर प्रहार केला.

मुख्यमंत्री-नारायण राणेंमध्ये जुगलबंदी

मुख्यमंत्री आणि नारायण राणे यांच्यात भाषणादरम्यान जुगलबंदी रंगली. राणेंनी आपल्या भाषणावेळी जे जे मनात होतं, ते ते सर्व बोलून मोकळे झाले. अगदी विमानतळाला विरोध करणारेच आता उद्घाटनाच्या मंचावर बसलेत, असं मुख्यमंत्र्यांसमोर राणे म्हणाले. राणेंनी आपल्या भाषणात अनेक टीकेचे बाण सोडले, सेना नेत्यांवर आरोप केले, शह देण्याचाही प्रयत्न केला, पण उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणावेळी राणेंच्या प्रत्येक टीकेला उत्तर दिलं, राणेंच्या शहला काटशह दिला, आपल्या भाषणाची वेळ येताच त्यांनी राणेंचा सगळा हिशेब व्याजासकट चुकता केला.

तुमच्या एका फोनवर मी सही केली

“तुमच्या कॉलेजच्या बाबतीत जेव्हा तुम्ही फोन केला, तेव्हा दुसऱ्याच क्षणी मी सही केली. विकासाच्या कामात मी कोतेपणा आणू इच्छित नाही. पण पेड्यातला गोडपणा अंगी बाळगावा लागतात. म्हणून तिळगूळ घ्या गोड बोला असं म्हणतात. मला बोलायचं नाही. मला बोलावं लागलं. आजचा कार्यक्रम कोकणसाठी महत्त्वाचा आहे. सगळे मिळून काम करु”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

“एवढे वर्ष विमानतळाला का लागले?, आमचं सरकार आलं की प्रश्न मार्गी लागला”

“एवढे वर्ष विमानतळाला का लागले? आम्ही कोकणचं कॅलिफोर्निया करु असे काहीजण म्हणाले होते. तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की, कॅलिफोर्नियाला अभिनमान वाटेल असं कोकण उभं करु. बाकीच्या गोष्ट आदित्यने सांगितल्या आहेत. पाठांतर करुन बोलणं वेगळं, आत्मसात करुन तळमळीने बोलणं वेगळं आणि मळमळीने बोलणं आणखी वेगळं असतं. त्याबद्दल मी नंतर बोलेल”, असं म्हणत त्यांनी राणेंचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

सिंधियाजी आपण अधिक तळमळीने बोललात, राणेंसमोर मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

सिंधिया महाराष्ट्राच्या अनेक विमानतळांबद्दल भरभरुन बोलले. तुमचं अभिनंदन करतो. इतक्या लांब राहूनही मराठी मातीचा संस्कार आपण जपलात. मला वाटत होतं की मी केंद्रीय मंत्री आहे आणि तुम्ही मुख्यमंत्री आहात. पण इथे राजकारण येणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच सिंधिया विमानतळाबद्दल अधिक तळमळीने बोलले, असं मुद्दामहून सांगत त्यांनी राणेंवर निशाणा साधला.

हे ही वाचा :

कोकणचा कॅलिफोर्निया करु म्हणणारे अनेकजण आले आणि गेले, उद्धव ठाकरेंचा राणेंवर प्रहार