‘हा तर असंगाशी संग, ठाकरेंनी नितीची तरी साथ सोडू नये’ मुनगंटीवारांचा खोचक टोला

| Updated on: Sep 21, 2021 | 4:28 PM

साकीनाका प्रकरणी असंवेदनशीलतेनं दुसरीकडे बोट दाखवू नका. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युती तोडून महाविकास आघाडी स्थापन केली. मात्र, त्यांनी आता नीतीची तरी साथ सोडू नये, अशी खोचक टीका मुनगंटीवार यांनी केलीय.

हा तर असंगाशी संग, ठाकरेंनी नितीची तरी साथ सोडू नये मुनगंटीवारांचा खोचक टोला
सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
Follow us on

चंद्रपूर : साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आठवड्यापूर्वी मुख्यमंत्र उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यात विधिमंडळाचं दोन दिवसाचं अधिवेशन घेण्याचा सल्ला राज्यपालांनी दिला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या या पत्राला आता मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. त्यात राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठई संसंदेचं चार दिवसांचं विशेष सत्र बोलवा, अशी मागणी राज्यपालांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या पत्रानंतर भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलीय. उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडली, पण त्यांनी नितीची तरी साथ सोडू नये, असा टोला माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावलाय. ते चंद्रपुरात बोलत होते. (BJP Leader Sudhir Mungantiwar criticizes Mahavikas Aghadi government)

‘राज्यपालांनी अधिवेशन घ्या असा सल्ला दिल्यानंतर केंद्राकडे बोट दाखवणे म्हणजे असंगाशी संग आहे. राज्यपालांची सूचना शिरोधार्ह मानून त्यावर अंमल करत देशाला मार्ग दाखविण्याची ही वेळ होती. साकीनाका संदर्भात आपण केलेल्या उपाययोजना पाहून, मग देशाला उत्तम काम दाखवून संसदेचे अधिवेशन घ्या, अशी भूमिका मांडता आली असती. साकीनाका प्रकरणी असंवेदनशीलतेनं दुसरीकडे बोट दाखवू नका. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युती तोडून महाविकास आघाडी स्थापन केली. मात्र, त्यांनी आता नीतीची तरी साथ सोडू नये’, अशी खोचक टीका मुनगंटीवार यांनी केलीय.

‘ज्यांनी चुकीचं कृत्य केलं त्यांना फेस येणार’

महाविकास आघाडीच्या राज्यातील एका घटक पक्षापेक्षा भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांची संख्या अधिक आहे. ईडीची चौकशी ही बेईमानांसाठी आहे. ज्यांनी चुकीचं कृत्य केलं त्यांना फेस येणार. भाजप देशभर्तीच्या भावनेचा तर महाविकास आघाडी खुर्चीसाठी असल्याची टीका मुनगंटीवार यांनी केलीय. गेल्या काही काळात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंपेक्षा शरद पवारांचं कौतुक अधिक केलं आहे. आता त्यांची भूमिका काय हा संशोधनाचा विषय असल्याचा टोलाही मुनगंटीवार यांनी यावेळी लगावलाय.

‘व्यवस्थेत विष पेरण्याचं काम सुरु’

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पोलिसांचा सर्वाधिक 54 वेळा वापर झाला. या सर्व प्रकरणात न्यायालयानं कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे फटकारलं आहे. महाविकास आघाडी सरकार पोलिसांच्या माध्यमातून व्यवस्थेत विष पेरण्याचं काम करत असल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केलीय. तर काँग्रेस आता मुद्द्यावरुन गुद्द्यावर आल्याचं स्पष्ट दिसत आहे. काँग्रेस पक्ष टूलकीटचा भाग धढाला आहे. सुनील केदार हे भाजपच्या संगतीत आले तर भाषा सुधारेल, अशी खोचक टिप्पणीही मुनगंटीवारांनी केलीय.

‘महाविकास आघाडीचे बारा वाजवा’

ओबीसी आरक्षणाबाबात राज्य सरकारनं विधिमंडळाचा विशेष अधिवेशन बोलवालं, त्यात संवाद करावा, अशी मागणी मुनगंटीवार यांनी आज केली. राज्य मागासवर्ग आयोगाकडून इम्पिरिकल डेटा गोळा करावा ही आठ महिन्यांपूर्वीची मागणी सरकारनं आधीच का पूर्ण केली नाही? आम्ही भाजप म्हणून सबका साथवर विश्वास ठेवतो. भाजपनं अनेक आंदोलनं केली मात्र सरकारमधील मंत्री ताठर भूमिका घेत आहेत. ओबीसी आरक्षणासंदर्भात भूमिका मांडणाऱ्या वकिलांना पैसे दिलेच नसल्याचं लेखी पत्रात उघड झालं. त्यामुळे ओबीसी आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकार संवेदनशील नसल्याचं स्पष्ट झाल्याची टीका मुनगंटीवारांनी केलीय. तसंच ओबीसी विरोधी महाविकास आघाडीचे बारा वाजवा असं आवाहनही त्यांनी राज्यातील ओबीसी जनतेला केलंय.

इतर बातम्या :

हसन मुश्रीफांचा पाय खोलात? किरीट सोमय्यांकडून ईडीकडे अजून कागदपत्र सुपूर्द

मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये पुन्हा पत्रसंघर्ष; केंद्राकडे बोट दाखवून पळता येणार नाही, दरेकर आक्रमक

BJP Leader Sudhir Mungantiwar criticizes Mahavikas Aghadi government