शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, आता काँग्रेसला खिंडार पडणार; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ

| Updated on: Aug 02, 2023 | 7:05 AM

आम्ही तिसरी आघाडी म्हणून कार्य करत नाही. आम्ही इंडियाच्या बाजूनेही नाही आणि एनडीएच्या बाजूने पण नाही. पण लोकांना नवीन पर्याय आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे.

शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, आता काँग्रेसला खिंडार पडणार; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ
k. chandrashekar rao
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कोल्हापूर | 2 ऑगस्ट 2023 : राज्यात शिवसेना फुटली. त्यापाठोपाठ वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीही एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. काँग्रेसला लवकरच खिंडार पडणार असल्याचं के. चंद्रशेखर राव यांनी सांगितलं. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच काँग्रेसमधील कोणता नेता बंड करणार? यावरही जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे कोल्हापुरात आले होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. शरद पवार आम्हाला भारतीय जनता पार्टीची बी टीम समजत होते. आज त्यांच्या पक्षाची काय स्थिती झाली आहे हे तुम्हाला माहिती आहे. महाराष्ट्रात शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, आता काँग्रे ही फुटण्याच्या मार्गावर आहे, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

एक लाख शेतकरी आत्महत्या करणार

आम्ही महाराष्ट्रातून सुरुवात जरी केली असली तरीही शेतकरी, दलित आणि तरुणांसाठी आमचं काम असणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत हे सरकार उदासीन आहे. आम्ही तेलंगणा पॅटर्न राबवण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र या सरकारला शेतकऱ्यांबाबत कोणतीही दया नाही. महाराष्ट्रातीलच एका अधिकाऱ्याने एक लाख शेतकरी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत असल्याचा अहवाल दिला, मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

महाराष्ट्रात 14 लाख पदाधिकारी

एनडीए किंवा इंडिया आघाडीत का गेला नाही? यावरही चंद्रशेखर राव यांनी भाष्य केलं. आम्ही तिसरी आघाडी म्हणून कार्य करत नाही. आम्ही इंडियाच्या बाजूनेही नाही आणि एनडीएच्या बाजूने पण नाही. पण लोकांना नवीन पर्याय आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. काँग्रेसने 50 वर्ष तर, भाजपने दहा वर्षे सत्ता भोगली. पण लोकांच्या पदरी निराशा आलेली आहे. आमच्या कामाची पद्धत बघून अनेक पक्षाने आमच्याशी संपर्क साधलेला आहे. आम्ही 50% काम पूर्ण केलेलं आहे. राज्यात बीआरएसचे 14 लाखाहून अधिक पदाधिकारी झालेले आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.