Balasaheb Thorat | शरद पवारही चीनच्या घुसखोरीमुळे चिंतीत असतील : बाळासाहेब थोरात

| Updated on: Jun 28, 2020 | 7:02 PM

"भाजपने काँग्रेसच्या सूचनांकडे आणि प्रश्नांकडे राजकारण म्हणून बघू नये! प्रश्न देशाच्या अखंडतेचा आहे, त्यामळे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष प्रश्न विचारणारच आहे." असे थोरात यांनी निक्षून सांगितले. (Balasaheb Thorat answers Sharad Pawar taunt over Politics on India China Issue)

Balasaheb Thorat | शरद पवारही चीनच्या घुसखोरीमुळे चिंतीत असतील : बाळासाहेब थोरात
Follow us on

मुंबई : शरद पवार काय म्हणाले, त्याची पूर्ण स्पष्टता नाही, मात्र त्यांच्या एखाद्या वक्तव्यावरुन माध्यमांनी निष्कर्षापर्यंत पोहोचून पंतप्रधानांना क्लीन चिट आणि राहुल गांधी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावण्याचा आततायीपणा करु नये. मला खात्री आहे, पवारही चीनच्या घुसखोरीमुळे चिंतीत असतील, असं उत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिलं. (Balasaheb Thorat answers Sharad Pawar taunt over Politics on India China Issue)

“चीन प्रश्नी काँग्रेस पक्ष सरकारसोबत आहे. मात्र त्याचा अर्थ राष्ट्रहिताचे मुद्दे मांडू नये असा होत नाही. सीमा सुरक्षेबाबत राहुल गांधी यांनी सरकारला प्रश्न विचारणे हे राजकारण नाही तर जनतेने दिलेली जबाबदारी आहे. 1962 आणि आजच्या परिस्थितीची तुलना होऊ शकत नाही हे लक्षात घ्यावे” असेही थोरात म्हणाले.

45 वर्षात चीन सीमेवर आपला एकही जवान शहीद झाला नव्हता. गलवान खोऱ्यात चीनच्या आगळीकीमुळे आपले 20 जवान शहीद झाले. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सीमेत कोणीही घुसले नाही, असे म्हणत आहेत. त्यांच्या या विधानाचा आधार घेऊन चीन आपल्या शहीदांना घुसखोर ठरवत आहे. याचे दु:ख काँग्रेसप्रमाणेच शरद पवार यांनाही असेलच, असे थोरात म्हणतात.

हेही वाचा : “खरे राजकारण कोण आणि का करत आहे?” शरद पवारांना काँग्रेसचे उत्तर

“राहुल गांधी जनतेच्या मनातील प्रश्न सरकारला विचारत आहेत. राहुल गांधींची चिंता ही देशाच्या अखंडतेशी सबंधित आहे. आजही ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी चीनच्या आगळीकीबद्दल चकार शब्दही काढला नाही. अशावेळी गप्प बसून कसे चालेल?” असा सवाल थोरातांनी विचारला.

“भाजपने काँग्रेसच्या सूचनांकडे आणि प्रश्नांकडे राजकारण म्हणून बघू नये! प्रश्न देशाच्या अखंडतेचा आहे, त्यामळे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष प्रश्न विचारणारच आहे.” असे थोरात यांनी निक्षून सांगितले.

“ज्या काँग्रेस पक्षाने 50 वर्षांपेक्षा जास्त काळ सत्तेमध्ये घालवला, ज्या पक्षाच्या कार्यकाळात कित्येक युद्ध झाली, युद्ध जिंकण्यात आली, तो पक्ष देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत राजकारण करतो, त्याचा प्रश्नच येत नाही” असं काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे आधी म्हणाले होते.

शरद पवार काय म्हणाले?

“चीन कुरापत नक्कीच करत आहेत. आपण आपला रस्ता आपल्या हद्दीत करत आहोत. आपण आपल्या भागात जाण्यासाठी रस्ता तयार केला आहे. सियाचीन भागासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. 1993 साली मी संरक्षण मंत्री असताना चीनला गेलो होतो. त्यावेळी बॉर्डरवरील सैन्य कमी करण्यावर चर्चा झाली होती. त्यानंतर दिवंगत पंतप्रधान नरसिंह राव यांनी करार केला”, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.

“सीमा भागात गस्त घालताना काहीही होऊ शकतं. त्यामुळे लगेच संरक्षण मंत्र्यांचं अपयश आहे, असं म्हणू नये”, असंही पवारांनी म्हटलं. “चीनने यापूर्वीच 1962 साली भारतीय भूमीचा ताबा घेतला आहे. आज घेतला की नाही, हे माहीत नाही. मात्र, राष्ट्रीय सुरक्षा मुद्द्यात राजकारण आणू नये”, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.