मुंबई : देशाची मूल्यवान आदर्श घटना, अखंड भारताचं भवितव्य जिच्या हाती आहे तिला अलीकडच्या सहा वर्षात धक्का लागतोय अशी भीती वाटते. मोदी सरकार घटनांच्या मुल्ये पाळत नाही. त्यामुळे घटनेचं संरक्षण करावं लागणार आहे, असं सांगत समता हे घटनेचं मुलभूत तत्त्व आहे, तेच काँग्रेसचं तत्त्व आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. (Congress Balasaheb Thorat Criticized Modi Government)
राज्यातील प्रदेश काँग्रेस कार्यालय मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. ध्वजारोहणानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी केंद्र सरकारवर त्यांनी टीकास्त्र डागलं.
देशात अराजकता निर्माण होते आहे. संसदेत दूरगामी परिणाम करणारे कायदे करत असताना दुर्देवाने चर्चा होत नाही. दिल्लीला लाखो शेतकर्यांनी वेढा घातला आहे, मात्र थंडीत या शेतकऱ्यांना चर्चेत गुंतवून ते कसे थकतील ते बघितले गेले. मोदी सरकार भांडवलदारांचे काम करणारे सरकार आहे, असं टीकास्त्र त्यांनी केंद्र सरकारवर डागलं.
रविवारी संध्याकाळी शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत धडकलं. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून तसंच काही प्रमुख मागण्यांसाठी मुंबईत हजारो शेतकरी जमा झाले. मात्र राज्यपाल राजभवनात नसल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्याचं निवेदन राज्यपालांना देता आलं नाही. हजारो शेतकरी पायी चालत येतायत हे माध्यमांवर दिसत होतं. एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा गरीब शेतकरी मुंबईत येतोय, तो भेटीची वेळ मागतोय अशा वेळी त्यांना वेळ द्यायला हवी होती, अशी अपेक्षा व्यक्त करताना मुंबईपासून गोवा विमानाने एक तासावर आहे. सन्मानीय राज्यपाल गोव्यातून आले असते तर ते जास्त शोभून दिसलं असतं. लोकमताचा आदर करणे ही शासन प्रतिनिधींची जबाबदारी असते. त्यांना फक्त निवेदन घेऊन केंद्राला पाठवायचे होते, असं थोरात म्हणाले.
मुंबईतल्या आझाद मैदानावर पार पडलेल्या भव्य मोर्चाकडे शिवसेनेच्या नेत्यांनी पाठ फिरवली. यावरुन उलट सुलट चर्चा सुरु आहे. मात्र शेतकरी मोर्चाला शिवसेनेने पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. राज्यात कायदा करणार आहोत त्या समितीतही शिवसेनेचे मंत्री आहेत. आम्ही राज्याचे कृषी कायदे करणार आहोत त्यात त्यांचा सहभाग असणार आहे. लवकरच हा कायदा केला जाईल, असं थोरात म्हणाले. (Congress Balasaheb Thorat Criticized Modi Government)
हे ही वाचा
राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संविधान स्तंभ उभारा, सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
ज्यांची ठाकरे सरकारनं शिफारस केली नाही; पण मोदींनी दिलं ती मराठी पद्म मंडळी कोण?