अदानी आणि अंबानी पंतप्रधान कार्यालय चालवत आहेत का? हुसेन दलवाईंचा घणाघात

| Updated on: Sep 24, 2020 | 6:52 PM

ब्रिटिशांनीही कायदे करुन काही प्रमाणात कामगारांना संरक्षण दिले. त्यामुळे भाजपा सरकारपेक्षा ब्रिटीश बरे होते असे म्हणण्याची वेळ कामगारांवर आली आहे, असं दलवाई म्हणाले.

अदानी आणि अंबानी पंतप्रधान कार्यालय चालवत आहेत का? हुसेन दलवाईंचा घणाघात
Follow us on

मुंबई : काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या कामगारविरोधी धोरणांवर जोरदार टीका केली आहे. 300 च्या आत कामगार संख्या असणारे उद्योग सरकारची परवानगी न घेता बंद करण्यास मुभा देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कामगारांना उद्ध्वस्त करणारा असून त्यांना भांडवलदारांचे वेठबिगार बनविणारा आहे, अशी टीका करतानाच अदानी आणि अंबानी पंतप्रधान कार्यालय चालवत आहेत का? असा संतप्त सवाल हुसेन दलवाई यांनी केला आहे. (Congress Ex MP Husain Dalwai criticizes Modi Government on Labor Bill)

‘केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून सातत्याने भांडवलदरांच्या हितासाठी काम करत आहे. नोटाबंदी, अविचारीपणे लागू केलेला जीएसटी यामुळे अगोदरच अर्थव्यवस्था उद्धवस्त झाली आहे. अचानक कुठलेही नियोजन न करता लावलेल्या लॉकडाऊनमुळे लघु उद्योग, छोटे व्यापारी, कामगार उद्धवस्त झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कोट्यवधी कामगारांचे रोजगार अगोदरच हिरावले गेले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दररोज उद्योग बंद पडत आहेत. लाखो लोक बेरोजगार होत आहेत, अशा कठीण प्रसंगी कामगारांच्या हितांना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. पण मोदी सरकार सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग खासगी भांडवलदारांना विकून कामागारांना बेरोजगार करत आहे. भांडवलदारांचे हित जोपासण्यासाठी कामगारांना उद्ध्वस्त करण्याचा एक कलमी कार्यक्रम भाजप सरकार राबवत आहे’ असा आरोपही हुसेन दलवाई यांनी केला.

‘नवीन कृषी विधेयके आणून शेतकऱ्यांना तर या सरकारने देशोधडीला लावले आहेच. आता कामगार कायद्यातील बदलामुळे कामगारांवर वेठबिगारीची वेळ येणार आहे. पहिले कामगार नेते स्व. नारायण मेघाजी लोखंडे यांनी उभी केलेली कामगार चळवळ मोडीत काढण्याचे हे कारस्थान आहे. देशभरातील कामगार मोदी सरकारच्या या कामगाविरोधी धोरणाचा कडाडून विरोध केल्याशिवाय राहणार नाहीत’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

“यांच्यापेक्षा ब्रिटीश बरे म्हणण्याची वेळ आलीय”

‘ब्रिटिशांनीही 1929 मध्ये काही कायदे करुन काही प्रमाणात कामगारांना संरक्षण दिले ते संरक्षण मोदी सरकारने काढून घेतले आहे. त्यामुळे भाजपा सरकारपेक्षा ब्रिटीश बरे होते असे म्हणण्याची वेळ कामगारांवर आली आहे’ असंही दलवाई म्हणाले.