… म्हणून विरोधीपक्ष गोंधळलेल्या अवस्थेत : अशोक चव्हाण

| Updated on: Feb 23, 2020 | 10:47 PM

विरोधीपक्ष भाजपने अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित चहापानावर बहिष्कार टाकला. यावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सडकून टीका केली आहे.

... म्हणून विरोधीपक्ष गोंधळलेल्या अवस्थेत : अशोक चव्हाण
Follow us on

मुंबई : विरोधीपक्ष भाजपने अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित चहापानावर बहिष्कार टाकला. यावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सडकून टीका केली आहे (Ashok Chavan criticize BJP). तसेच सरकारच्या चांगल्या निर्णयांमुळे विरोधीपक्षांना काय करावं हेच कळत नाही. त्यामुळेच भाजप गोंधळलेल्या अवस्थेत असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या शेती धोरणावरही टीका केली.

अशोक चव्हाण म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारचं काम अगदी व्यवस्थित सुरु आहे. त्यामुळे विरोधकांना सरकारवर टीका करण्याची संधीच मिळत नाही. म्हणूनच ते गोंधलेल्या अवस्थेत आहेत. त्यांना सरकारच्या चांगल्या कामामुळे कसा फायदा घ्यायचा हेच कळेना. खरंतर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्यापेक्षा इथं येऊन चर्चा करायला हवी होती. मात्र, विरोधी पक्ष स्वतः गोंधलेल्या अवस्थेत आहेत.”


केंद्र सरकारने पीकविमा आता ऐच्छिक केला आहे. केंद्र सरकारने पिकविम्याची रक्कम कमी केली आणि त्याचा काही भार राज्यांवर टाकला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांबाबत घेतलेला असा निर्णय अनपेक्षित आणि चुकीचा आहे. पिकविम्यामुळे शेतकऱ्यांना चांगली आर्थिक मदत व्हावी, आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा ही अपेक्षा असते. मात्र, आता पीकविमा ऐच्छिक केल्याने नव्यानं मुद्दा निर्माण झाला आहे. नैसर्गिक आपत्ती येईल तेव्हा शेतकऱ्यांना पीकविमा कोण देणार? असाही प्रश्न यामुळे तयार झाला आहे. याबाबत आगामी काळात मंत्रिमंडळाला काही धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे, असंही अशोक चव्हाण यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी उद्या शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी येणार असल्याचंही सांगितलं.

काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) यांच्याविषयी काही मतं आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेटही घेतली आहे. अद्याप आमच्या समन्वय समितीत यावर चर्चा व्हायची आहे. या चर्चेनंतर स्थिती स्पष्ट होईल, असंही अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

Ashok Chavan criticize BJP