हर्षवर्धन पाटील अनेक मुख्यमंत्र्यांसाठी बुलेट प्रूफ जॅकेट होते : मुख्यमंत्री

| Updated on: Sep 11, 2019 | 4:47 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे इंदापूरची उमेदवारीही हर्षवर्धन पाटलांना (Harshvardhan Patil joins BJP) जाहीर केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबईतील गरवारे क्लबमध्ये हा प्रवेश पार पडला.

हर्षवर्धन पाटील अनेक मुख्यमंत्र्यांसाठी बुलेट प्रूफ जॅकेट होते : मुख्यमंत्री
Follow us on

मुंबई : काँग्रेस नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil joins BJP) यांनी अखेर भाजपात प्रवेश केला. पूर्वीपेक्षा जास्त जागा यावेळी जिंकू आणि त्या जागांमध्ये आता इंदापूरच्या जागेचाही समावेश झालाय, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे इंदापूरची उमेदवारीही हर्षवर्धन पाटलांना (Harshvardhan Patil joins BJP) जाहीर केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबईतील गरवारे क्लबमध्ये हा प्रवेश पार पडला.

हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात यावं यासाठी गेल्या पाच वर्षांपासून वाट पाहत होतो, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर हर्षवर्धन पाटील लोकसभेपूर्वी आले असते तर बारामतीत भाजपचा खासदार असता, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. दरम्यान, हा इंदापूरच्या जनतेचा निर्णय असल्याचं हर्षवर्धन पाटील म्हणाले.

“अगदी योग्य वेळी भाजपात येण्याचा निर्णय”

हर्षवर्धन पाटलांशी गेल्या 20 वर्षांपासून मैत्रीचा संबंध आला. हर्षवर्धन पाटील भाजपात आले हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. गेल्या पाच वर्षांपासून डोळे लावून बसलो होतो की ते कधी आमच्या पक्षात येतील. त्यांनी अतिशय योग्य वेळी प्रवेश घेतला, असं मुख्यमंत्री म्हणाले.

अनुभवी नेता पक्षात आल्यामुळे आणखी बळकटी मिळेल. अनेक वर्ष विधानसभेत आम्ही आणि त्यांनी सोबत काम केलं. ते मंत्री होते आणि आम्ही विरोधी पक्षात होतो. पण संबंध नेहमीच जवळचे राहिले. हक्काने जवळ जाता येईल असे ते होते. अनेक मुख्यमंत्र्यांसाठी हर्षवर्धन यांनी बुलेट प्रूफ जॅकेट म्हणून काम केलं. आमच्या बुलेट सुटायच्या तेव्हा हर्षवर्धन ते झेलायचे आणि नंतर आमच्या जवळ येऊन जाऊ द्या, राहू द्या, असं म्हणून समजून सांगायचे, अशी आठवणही मुख्यमंत्र्यांनी सांगितली.

“भाजपची ओढ कोणत्याही पदासाठी नाही”

या निवडणुकीचा निकाल जनतेने ठरवला आहे. लोकसभेलाही जनतेने निकाल ठरवला होता, पण अनेकांना त्यात शंका होती. आम्हाला शंका कधीच नव्हती. आज खऱ्या अर्थाने या देशात मोदीजींनी जो विश्वास तयार केलाय, मजबूत देश तयार केला, अगदी शेवटच्या व्यक्तीलाही वाटतं की देशाचं भवितव्य मोदीजीच घडवू शकतात. त्यामुळे अनेक नेत्यांचा ओढा भाजपकडे आहे. हा ओढा कोणत्याही पदासाठी नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.