सुनील केदारांचे ट्विट स्वभावाप्रमाणे, राहुल गांधींनी पक्षाचे अध्यक्ष व्हावे ही सर्वांची इच्छा : माणिकराव ठाकरे

| Updated on: Aug 24, 2020 | 12:40 PM

काही नेत्यांनी अशा प्रकारचा पत्र व्यवहार करायला नको होता," असे माणिकराव ठाकरे म्हणाले. (Manikrao Thakre on CWC and Rahul Gandhi)

सुनील केदारांचे ट्विट स्वभावाप्रमाणे, राहुल गांधींनी पक्षाचे अध्यक्ष व्हावे ही सर्वांची इच्छा : माणिकराव ठाकरे
Follow us on

यवतमाळ : काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन सुरु असलेल्या अंतर्गत धुसफूसवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. “काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाचं अध्यक्ष व्हावे ही सगळ्यांची इच्छा आहे. मात्र काही नेत्यांनी अशा प्रकारचा पत्र व्यवहार करायला नको होता,” असे माणिकराव ठाकरे म्हणाले. (Manikrao Thakre on CWC and Rahul Gandhi)

काँग्रेस नेते सुनील केदार यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे ट्विट केलं. महाविकासआघाडीत काहीही नाराजी नाही. एखादा आमदार विकास काम करुन जर आंदोलनाची भूमिका घेत असेल तर त्याबाबत काळजी घेतली पाहिजे अशी वेळ येऊ नये, असेही माणिकराव ठाकरे म्हणाले.

काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन वादावादी

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी असलेल्या सोनिया गांधी यांनी पद स्वीकारुन वर्ष होत आहे. काँग्रेस कार्यकारिणी अर्थात CWC बैठक आज होत आहे. या बैठकीत सोनिया गांधी राजीनामा देण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन गट पडले आहेत. एका गटाची मागणी ही सोनिया गांधी अध्यक्षपदी राहाव्या, तर दुसऱ्या गटाने राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी केली आहे. काँग्रेसचं अध्यक्षपद गांधी घराण्याकडेच रहावं यासाठी काँग्रेसच्या कार्यकारिणीचे सदस्य आग्रही आहेत.

काँग्रेसच्या 23 नेत्यांचं पत्र 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना 23 नेत्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेबाबत पत्र पाठवले आहे. काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा असं या पत्रात म्हटलं आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांचा समावेश असल्याचे बोललं जातं आहे.पंजाबमधून गांधी परिवाराबाहेरील अध्यक्ष निवडण्यास विरोध करण्यात आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याबाबत विरोध केला आहे.

पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्याकडे असेल तर भाजपविरोधात लढता येईल : सुनील केदार

“काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मी मनापासून समर्थन करतो. मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी गांधी घराण्याच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणे हे लज्जास्पद आहे. त्यांनी त्यांच्या या कृत्याबद्दल तातडीने माफी मागितली पाहिजे. अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाहीत”, असं ट्विट राज्याचे दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी केलं.

राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर सोनियांकडे अध्यक्षपद

सोनिया गांधी 14 मार्च 1998 पासून 16 डिसेंबर 2017 पर्यंत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा होत्या. त्यानंतर राहुल गांधी यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. राहुल गांधी यांनी दोन वर्ष अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. मात्र, गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या आग्रहानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. (Manikrao Thakre on CWC and Rahul Gandhi)

संबंधित बातम्या : 

अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधींनी जर सांगितलं, तर महाराष्ट्रातील सत्ता सोडू : विजय वडेट्टीवार

पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरांनी प्रश्न उपस्थित करणे लज्जास्पद, सुनील केदार यांचा हल्लाबोल