मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे, मरण पत्करेन पण माफी मागणार नाही : राहुल गांधी

| Updated on: Dec 14, 2019 | 2:08 PM

मी राहुल सावरकर नाही राहुल गांधी आहे. मरण पत्करेन पण माफी मागणार नाही, असा आक्रमक पवित्रा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi crticized on BJP) यांनी घेतला आहे.

मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे, मरण पत्करेन पण माफी मागणार नाही : राहुल गांधी
Follow us on

नवी दिल्ली : मी राहुल सावरकर नाही राहुल गांधी आहे. मरण पत्करेन पण माफी मागणार नाही, असा आक्रमक पवित्रा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi crticized on BJP) यांनी घेतला आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत भारतात मेक इन इंडिया नसून रेप इन इंडिया झाल्याचे दिसत आहे, असं म्हटले होते. या वक्तव्याचा भाजपकडून विरोध करण्यात आला तसेच राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणीही भाजपने केली होती. यावर भाजपला प्रत्युत्तर देताना राहुल गांधींनी (Rahul Gandhi crticized on BJP) निशाणा साधला.

“मी मरण पत्करेन पण माफी मागणार नाही. मी सत्य बोललो मग माफी का मागू, मी राहुल सावरकर नाही राहुल गांधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी देशाची माफी मागावी”, असं राहुल गांधी यांनी सांगितले.

“काही दिवसांपूर्वी 15-20 लोकांचे एक लाख 40 हजार कोटींचे कर्ज माफ करण्यात आले. श्रीमंत लोकांचे कर्ज माफ केले. पण आम्ही राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. कारण आम्हाला माहित आहे शेतकऱ्यांशिवाय अर्थव्यवस्था पुढे जाणार नाही. तसेच कमगारांशिवाय देश पुढे जाणार नाही. पण मोदींनी तुमचा सर्व पैसे खेचून श्रीमंत लोकांना दिला”, असा आरोप यावेळी राहुल गांधींनी केला.

“तुम्ही देशाला मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदींना निवडून दिले. देशाची प्रगती करण्यासाठी, जीडीपी वाढवण्यासाठी, पण त्यांनी काय केले”, असा प्रश्नही राहुल गांधीनी उपस्थितांना विचारला.

“जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतात जाऊन पाहा नरेंद्र मोदींनी काय काम केलं. त्यांनी आग लावली. समाजात विभाजनाचे काम त्यांनी केले. तसेच देशाला कमजोर करण्याचे काम मोदींनी केले. पण सर्वांनी एकत्र येऊन देशाला वाचवूया. देशाला कमजोर करण्यापासून वाचवूया. मोदी दररोज टीव्हीवर दिसतात. टीव्हीवर दिसण्यासाठी खूप पैसा खर्च करतात. हा पैसा येतो कुठून”, असाही राहुल गांधी म्हणाले.

गांधी म्हणाले, “गेल्या पाच वर्षात मोदींनी उद्योजक अदानी यांना 50 कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत. एक लाख कोटींपेक्षाही अधिक कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेले आहेत. याला आपण चोरी आणि भ्रष्टाचार नाही बोलणार तर काय बोलणार.”

दरम्यान, आज (14 डिसेंबर) काँग्रेस पक्षातर्फे नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर भारत बचाओ आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. त्यासोबतच कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधीहीसह इतर वरिष्ठ नेतेही उपस्थित होते.