काँग्रेस-राष्ट्रवादीचा तूर्तास शिवसेनेला पाठिंबा नाही, आधी आघाडीची चर्चा, मग शिवसेनेशी चर्चेचं ठरवणार!

| Updated on: Nov 12, 2019 | 7:55 PM

महाराष्ट्रातील राजकीय पेचावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल आणि के सी वेणुगोपाल हे आज दिल्लीवरुन मुंबईत आले.

काँग्रेस-राष्ट्रवादीचा तूर्तास शिवसेनेला पाठिंबा नाही, आधी आघाडीची चर्चा, मग शिवसेनेशी चर्चेचं ठरवणार!
Follow us on

मुंबई : काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Congress NCP meeting) यांची भेट घेऊन चर्चा केली. महाराष्ट्रातील राजकीय पेचावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र (Congress NCP meeting) प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल आणि के सी वेणुगोपाल हे आज दिल्लीवरुन मुंबईत आले. या नेत्यांची मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये बैठक झाली. त्यानंतर आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

शरद पवार, अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे वेणुगोपाल,अशोक चव्हाण, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पेटल यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीचे बडे नेते यावेळी उपस्थित होते.

प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेची सुरुवात केली. त्यांनी बैठकीची माहिती दिली. दोन्ही पक्षाच्या नेत्यांना चर्चा झाली असून संयुक्त पत्रक बनवले आहे. शिवसेनेनं काल अधिकृत संपर्क केला. कोणत्याही निर्णयापूर्वी आमची बैठक होणं गरजेचं होतं.  दोन्ही पक्षांची निवडणुकीत आघाडी झालेली आहे, शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत व्यापक चर्चा झाली, दोघांच्या सहमतीनंतर निर्णय घेऊ, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

अगोदर आधी दोन मित्रपक्षांशी चर्चा मगच शिवसेनेशी चर्चा ही आमची भूमिका स्पष्ट आहे, असं काँग्रेस नेते अहमद पटेल आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. शिवाय आजच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. आधी आम्ही दोन्ही पक्षात सर्व बाजूने चर्चा करु, मग शिवसेनेसोबत चर्चेला बसू असं आघाडीकडून सांगण्यात आलं.

सरकार कसं चालणार, धोरण कसं असणार याविषयी स्पष्टता येत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय घेणं कठीण आहे. सरकार बनवायचं की नाही, बनवायचं असेल तर कोणत्या मुद्द्यावर आणि कोणत्या धोरणावर हे आधी ठरेल. मग सत्तावाटपावर चर्चा होईल, असं शरद पवार म्हणाले.

अहमद पटेल यांची प्रतिक्रिया

ज्याप्रकारे राष्ट्रपती राजवटीची राज्यपाल आणि केंद्र सरकारने शिफारस आणि अंमलबजावणी केली त्याचा मी निषेध करतो. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपती राजवट कशी लावावी याबाबत काही नियम बनवले आहेत. मात्र, मागील काही काळात या सरकारने अनेक राज्यांमध्ये या नियमांचं उल्लंघन करत राष्ट्रपती राजवट लावली. महाराष्ट्रात सर्व मोठ्या पक्षांना सत्तास्थापनेबाबत विचारणा करणं अपेक्षित होतं. मात्र, राज्यपालांनी काँग्रेसला विचारणा न करताच राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. सोनिया गांधींनी देखील या महत्त्वाच्या विषयावर स्पष्टता येण्यासाठी चर्चा आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आम्ही आमचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे, असं काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी सांगितलं.

शिवसेनेने कालच आमच्याशी पहिल्यादा संपर्क केला. त्यानंतर अनेक गोष्टींमध्ये स्पष्टता येणे, सामाईक धोरण ठरवणे बाकी आहे. त्यामुळे याची स्पष्टता आल्यानंतरच यावर अंतिम निर्णय होईल. आधी सहकारी पक्षाशी चर्चा केली जाईन मगच शिवसेनेशी चर्चा केली जाईल.

शिवसेनेने आमच्याशी कालच संपर्क साधला, त्यानंतर आम्ही तातडीने राष्ट्रवादीशी संपर्क केला, मग आम्ही चर्चेसाठी मुंबईत आलो, इथे आम्ही उशिर केला म्हणण्याला अर्थ काय? असा प्रश्न अहमद पटेल यांनी उपस्थित केला.

शरद पवार-

काँग्रेस-राष्ट्रवादीचा निवडणुकीत एकच जाहीरनामा होता. त्यामुळे आम्ही काय करायचं यावर सहमत आहोत, किमान समान कार्यक्रमावर चर्चा नाही. आधी आम्ही सहकारी पक्षांशी चर्चा करुनच शिवसेनेशी संपर्क करु, असं शरद पवार म्हणाले.