169 नाही, ‘170’ चा आकडा खरा ठरला : संजय राऊत

| Updated on: Nov 30, 2019 | 5:08 PM

सभागृहात विश्वासदर्शक ठरावाची प्रक्रिया दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्त्वात काटेकोरपणे पार पडली. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने 169 मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

169 नाही, 170 चा आकडा खरा ठरला : संजय राऊत
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने आज 169 विरुद्ध शून्य मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. शिवेसना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांसह छोटे पक्ष, अपक्षांनी ठाकरे सरकारच्या बाजूने मतदान केल्याने बहुमताचा 145 हा आकडा (Sanjay Raut floor test) सहज पार झाला. त्यामुळे महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने आजपासून ठाकरे सरकार अस्तित्त्वात आलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut floor test) हे पहिल्यापासून सांगत होते, घासून नाही तर ठासून येणार, 170 आमदारांचं समर्थन मिळणार. राऊतांचं हे भाकीत खरं ठरलं आहे.

ठाकरे सरकारच्या बाजूने 169 आमदारांनी मतं दिली असली, तरी महाविकासआघाडीचं खरं संख्याबळ हे 170 होतं. कारण दिलीप वळसे पाटील यांची हंगामी अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे, ते मतदान करु शकले नाहीत, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.

दरम्यान, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर बाजूचे आमदार एका बाजूला आणि विरोधातील आमदार दुसऱ्या बाजूला विभागणी करण्यात आली. त्यादरम्यान भाजपने गोंधळ घालत, सभात्याग केला.

मात्र सभागृहात विश्वासदर्शक ठरावाची प्रक्रिया दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्त्वात काटेकोरपणे पार पडली. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने 169 मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला.

चार आमदार तटस्थ

दरम्यान, या विश्वासदर्शक ठरावावेळी एमआयएमचे दोन, मनसेचा एक आणि माकपचा आमदार तटस्थ राहिले. विश्वासदर्शक ठरावावेळी महाविकासआघाडीच्या बाजूने 169 सदस्यांची मत पडली. त्यामुळे महाविकासआघाडीने विश्वासदर्शक ठराव जिंकला. तर 4 सदस्य तटस्थ राहिले. मात्र तटस्थ राहिलेल्या सदस्यांपैकी एमआयएमच्या सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला.

एमआयएमचे धुळे शहर मतदारसंघातून फारूक शाह तर मालेगाव मध्य मतदारसंघातून मुफ्ती मोहम्मद इस्माईल हे दोन सदस्य निवडून आले आहेत. कल्याण ग्रामीणमधून निवडून आलेले मनसे आमदार प्रमोद पाटील, डहाणूमधून निवडून आलेले माकपचे विनोद निकोले हे दोन सदस्य तटस्थ राहिले. मात्र एमआयएमच्या दोन आमदारांनी तटस्थ भूमिकेत राहूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला.