अशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष?

| Updated on: Jun 20, 2019 | 12:20 PM

अत्यंत कमी वयात प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या गहलोत यांच्याकडे कुशल संघटक म्हणून पाहिलं जातं. अशोक गेहलोत हे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक असून, गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय आहेत.

अशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष?
Follow us on

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांच्या शर्यतीत पक्षातील अत्यंत मोठे, ताकदवान आणि अनुभवी नेत्याचं नाव पुढे आलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नावाची काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आलं आहे. लवकरच अशोक गेहलोत यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अशोक गेहलोत हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, तर सोबत आणखी दोन ते तीन कार्यकारी अध्यक्ष असतील, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्याचवेळी, अशोक गेहलोत यांची काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागल्यास राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी सचिन पायलट यांची नियुक्ती केली जाईल.

कोण आहेत अशोक गहलोत?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी आतापर्यंत दोन वेळा राजस्थानचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. सध्या तिसऱ्यांदा ते राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.

काँग्रेसच्या केंद्रीय संघटनेत अत्यंत महत्त्वाचं पद त्यांच्याकडे आहे. शिवाय कार्यकर्ते आणि जनतेमध्ये गहलोत यांची छाप आहे. अत्यंत कमी वयात प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या गहलोत यांच्याकडे कुशल संघटक म्हणून पाहिलं जातं. अशोक गेहलोत हे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक असून, गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय आहेत.

राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधी यांच्याकडे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद देण्यात आलं. राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी गुजरातच्या निवडणुकीत चांगला प्रभाव दाखवून दिला. त्यानंतर राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सत्तांतर घडवून, काँग्रेसची सत्ता आणली. त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्बत होत असतानाच, लोकसभा निवडणुकीत काँग्रेचा दारुण पराभव झाला. खासदार संख्येची शंभरीही काँग्रेसला गाठता आली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राहुल गांधींच्या नेतृत्त्वावर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले.

स्वत: राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला काँग्रेसमधून विरोध होत आहे. राहुल गांधी यांनीच पक्षाध्यक्षपद सांभाळावं, अशी अनेक काँग्रेस नेत्यांची भूमिका आहे. मात्र, राहुल गांधी हे आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.