गडचिंचले भाजपचा गड, 10 वर्षांपासून त्यांचा सरपंच, अटकेतील बहुसंख्य भाजपचेच : काँग्रेस

| Updated on: Apr 20, 2020 | 3:57 PM

पालघर हत्यांकाड प्रकरणावरुन काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर भाजपवर सडकून टीका केली (Sachin Sawant slams BJP).

गडचिंचले भाजपचा गड, 10 वर्षांपासून त्यांचा सरपंच, अटकेतील बहुसंख्य भाजपचेच : काँग्रेस
Follow us on

मुंबई :‘दिवशी गडचिंचले’ ग्रुप ग्रामपंचायत हा भाजपचा गड आहे (Sachin Sawant slams BJP). गेल्या 10 वर्षांपासून तिथे भाजपचा सरपंच आहे. सध्या भाजपच्या चित्रा चौधरी या सरपंच आहेत. अटक केलेल्यांमध्ये बहुसंख्य भाजपचे आहेत”, असा घणाघात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. पालघर हत्यांकाड प्रकरणावरुन सचिन सावंत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर भाजपवर सडकून टीका केली (Sachin Sawant slams BJP).

“पालघरच्या दुर्देवी घटनेवरून भाजप धार्मिक राजकारण करण्याचा हीन प्रयत्न करत आहे. याची भाजपला लाज वाटली पाहिजे. गेल्या 5 वर्षात सत्तेत असताना धुळ्यात झालेली आणि वर्षंभरापूर्वी पालघरलाच झालेल्या किंवा राज्यातील अन्य घटनांना पायबंद घालू न शकणारे आज यावर राजकारण करत आहेत हे गंभीर आहे”, अशी टीका सचिन सावंत यांनी केली.

“चोरांच्या अफवेबरोबरच एक अफवा होती की काही मुस्लिम वेशांतर करुन मुले पळवून किडनी काढतात आणि विहिरीत थुंकून करोना पसरवतात. अशा अफवांनी समाजाला हिंसक बनवण्याचे कारस्थान देशात आजवर कोण करतंय? साधूंचा वेश पाहूनही मॉब थांबत नाही, हे भयानक आहे. या अफवांमागे कोण आहे? याची चौकशी झाली पाहिजे”, असं सचिन सावंत म्हणाले.

“मॉबलिंचिंगचे केंद्र असलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शहाजोगपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करतात”, असा टोला सचिन सावंत यांनी लगावला. दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “राज्य सरकार आरोपींनी सोडणार नसून कठोर कारवाई करेल आणि असे प्रकार महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाहीत”, असादेखील इशारा त्यांनी दिला.

काय आहे प्रकरण? (What is Palghar mob lynching case)

गडचिंचले गावात चोर-दरोडेखोर शिरल्याची अफवा पसरल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्रितपणे पहारा देण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी (16 एप्रिल) रात्री उशिरा एक इको गाडी दाभाडी-खानवेल मार्गावरुन जात होती. या गाडीत वाहनचालकासह तिघे जण होते.

दाभाडी-खानवेल मार्गावर मोठ्या जमावाने त्यांची गाडी अडवली. त्यांची पूर्णपणे विचारपूस न करताच चोर समजून त्यांच्यावर दगडफेक आणि लाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात ही घटना घडली

पालघरच्या कासा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. अखेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करत सर्वांना ताब्यात घेतलं. डहाणू न्यायालयाने 101 आरोपींना 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील 9 आरोपी 18 वर्षाखालील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पोलीस इतर फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

संबंधित बातम्या :

पालघर हत्याकांड धार्मिक वादातून नाही, खटला CID कडे, अमित शाहांशीही चर्चा : मुख्यमंत्री