“प्राजक्त, विकास निधीसाठी जयंतमामाची मदत घ्या नाही तर माझाच ‘मामा’ व्हायचा”

| Updated on: Jan 30, 2021 | 2:06 PM

"प्राजक्त, नगरच्या विकासनिधीसाठी 'मामा'ची मदत घ्या नाही तर माझाच मामा व्हायचा", असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरच्या सभेत खसखस पिकवली. | DCM Ajit Pawar taunt Prajakt Tanpure

प्राजक्त, विकास निधीसाठी जयंतमामाची मदत घ्या नाही तर माझाच मामा व्हायचा
Ajit pawar, jayant patil And prajakt tanpure
Follow us on

अहमदनगर : “प्राजक्त, नगरच्या विकासनिधीसाठी ‘मामा’ची मदत घ्या नाही तर माझाच मामा व्हायचा”, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नगरच्या सभेत खसखस पिकवली. मंत्री जयंत पाटील (jayant patil) हे नात्याने राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (prajakt Tanpure) यांचे मामा. अजित पवार यांनी आजच्या भाषणात जयंतरावांच्या आणि प्राजक्त तनपुरेंच्या नात्याचा उल्लेख करत उपस्थितांना खळखळून हसायला भाग पाडलं. निधी मिळवताना मामाचीही मदत घ्या नाहीतर आमचाच मामा व्हायचा, अशी मिश्किल टिप्पणी अजितदादांनी केली.  (DCM Ajit Pawar taunt Prajakt Tanpure Over Jayant Patil)

उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी ‌येथे मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाचं अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. यानंतर त्यांनी जोरदार भाषण केलं. संपूर्ण नगर जिल्ह्याचा आढावा घेत राष्ट्रवादीच्या आमदारांना जनतेने निवडून दिल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले.

अजितदादांकडून प्राजक्त तनपुरेंचं कौतुक, करुन दिली जबाबदारीची जाणीव

“मी पहिल्यांदा निवडून आलं होतो तेव्हा मलाही राज्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली होती. पण माझ्याकडे तीन खात्यांचा कार्यभार होता. आता तुमच्या या पठ्ठ्याला (प्राजक्त तनपुरे) पाच-सहा मंत्रालयांचं राज्यमंत्रिपद मिळालंय. वाढपी तुमचाच आहे, पंगत जेवायला बसलीय, राहुरीला जास्त मिळणार यात शंकाच नाही. पण वाढपी कशामुळे निवडून आला, तर कोपरगाव, संगमनेर, राहुरी, अहमदनगर अशा सगळ्या मतदारसंघांमुळे…”

“प्राजक्ता, इथेही लक्ष दे रे बाबा, माझ्या बारामतीकडे नंतर लक्ष दिलंस तरी चालेल. पण सगळ्यांना वाटलं पाहिजे, राहुरीसारखं आमच्याकडेही लक्ष देतोय”, असं म्हणत अजितदादांनी एकाचवेळी कौतुक, टोले आणि टोमणे लगावले.

पिचड पितापुत्र निशाण्यावर

राष्ट्रवादीचे तत्कालिन नेते मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड यांनी विधानसभेच्या तोंडावर भाजपात प्रवेश केला. त्यांचा हा भाजप प्रवेश राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागलाय. कारण आठवड्याभरापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नगर दौऱ्यात पिचड यांच्यावर निशाणा साधला होता. आज अजितदादांनीही पिचडांवर बोलताना भाजपत गेल्यापासून त्यांची अवस्था वाईट असल्याचं म्हटलं.

“काही लोक साहेबांना (राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार) सोडून गेले, अकोल्यात त्यांची काय गत झाली बघा, सोडून गेलेले पडले”, असं म्हणत खास त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांनी पिचड विषयावर भाष्य केलं.

“शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेता म्हणजे शरद पवार”

“शेतकरी आंदोलनाला ‌केंद्राने प्रतिसाद द्यायला हवा होता. शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेता म्हणजे शरद पवार. शेतकरी कायद्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा. अण्णा हजारेंवर उपोषणाची वेळ आली. हे सरकार शेतकरीविरोधी आहे. शेतकरी मोडला तर देश मोडेल. शेतकरी ट्रॅक्टर परेडला हिंसक वळण लागलं. आपला शेतकरी कधीच हिंसा करत नाही. गालबोट लावण्यासाठी कोणीतरी शिरलं आणि आंदोलनास गालबोट लावण्याचा प्रयत्न यातून निश्चित झाला” अशी शक्यताही अजित पवारांनी बोलून दाखवली.

हे ही वाचा :

साहेबांना सोडून गेले नि अकोल्यात काय गत झाली बघा, अजित पवारांच्या पिचड पितापुत्रांना कानपिचक्या