मनसे विधानसभेच्या 100 जागा लढवणार : सूत्र

| Updated on: Sep 20, 2019 | 3:17 PM

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (20 सप्टेंबर) महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

मनसे विधानसभेच्या 100 जागा लढवणार : सूत्र
Follow us on

मुंबई: आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (20 सप्टेंबर) महत्त्वाची बैठक घेतली आहे. या बैठकीत मनसेने विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसे 100 जागांवर निवडणूक लढवणार आहे. या बैठकीला मनसेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे राज ठाकरे विधानसभा निवडणुकीबाबत ठोस निर्णय घेणार असा अंदाज लावला जात होता. अखेर तो खरा ठरला.

राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक न लढता राज्यभरात भाजपच्या विरोधात प्रचार केला होता. त्यावेळी मनसे लोकसभेत शक्ती खर्च न करता विधानसभेवर लक्ष केंद्रीत करेल, असा अंदाज वर्तवला गेला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच मनसेत विधानसभा निवडणूकही न लढण्याचा सूर (Raj Thackeray meeting) पाहायला मिळाला होता. त्यानंतर मनसेने माघार घेतल्याचंही बोललं गेलं. मात्र, राज ठाकरेंनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, राज ठाकरेंचा निवडणूक न लढण्याचा सूर पाहाता मागील बैठकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये काहीसं गोंधळाचा वातावरण होतं. मागील बैठकीत देखील काही पदाधिकाऱ्यांची निवडणूक लढण्याची भावना व्यक्त केली होती. काही जागा लढवाव्यात असं काही पदाधिकाऱ्यांचं मत होतं. मात्र, राज ठाकरेंनी मागील बैठकीत निवडणूक लढण्याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतला नव्हता. त्यांनी केवळ पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली होती. आजच्या बैठकीत त्यांनी मनसेची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे.

‘या कठीण आर्थिक परिस्थितीत निवडणूक लढवणे कठीण’

मनसेच्या मागील बैठकीत राज ठाकरेंनी निवडणूक न लढण्याबाबत सूर व्यक्त केला होता. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनीही राज ठाकरेंच्या (Raj Thackeray meeting) सुरात सूर मिसळला. विशेष म्हणजे स्वतःकडील पैसे जपून वापरा. देशाची आर्थिक स्थिती यापुढे अत्यंत बिकट होईल, असा सल्लाही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचं बोललं गेलं होतं. या कठीण आर्थिक परिस्थितीत निवडणूक लढवणेही कठीण असल्याचं सूचक वक्तव्य राज ठाकरेंनी बैठकीत केलं होतं. त्यामुळे निवडणूक लढायची झाल्यास उमेदवाराला पक्षाकडून आर्थिक पाठबळ मिळणं कठीण असल्याचं यातून स्पष्ट करण्यात आलं.

‘ईव्हीएम निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन’

राज ठाकरेंनी मागील काही दिवसांपासून ईव्हीएमविरोधात आंदोलन सुरु केलं होतं. यासाठी त्यांनी देशभरातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांची भेटही घेतली. मतपत्रिकांवर निवडणूक न झाल्यास निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं.

लोकसभेची एकही जागा लढली नाही

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा 2019 च्या निवडणुकीत एकही उमेदवार उभा केला नव्हता. राज ठाकरे यांनी एकप्रकारे काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह या दोघांना थेट विरोध करत, राज ठाकरेंनी प्रचाराचा धुरळा उडवला होता.