शरद पवारांच्या राजकारण युगाचा अस्त : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Sep 22, 2019 | 12:30 PM

काळाचा महिमा पाहा, शरद पवारांनी पक्ष बनवले, तोडले, फोडले, बिघडवले. आज त्यांच्या पक्षासोबत तेच होत आहे. त्यांनी जे केलं, ते त्यांच्याकडे परत आलं' अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी पवारांना टोला लगावला.

शरद पवारांच्या राजकारण युगाचा अस्त : देवेंद्र फडणवीस
Follow us on

मुंबई : शरद पवार पक्ष तयार करण्याचं आणि पक्ष फोडण्याचं राजकारण करायचे. त्यांच्या राजकारणाचं युग आता संपलं आहे, मी ‘शरद पवार’ होऊ शकत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis on Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार यांचा समाचार घेतला.

‘इंडिया टुडे’ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. ‘शरद पवार मला म्हणाले की तुम्ही साखर कारखान्याच्या मालकांना नोटीस दाखवता, तुम्ही आमच्या पक्षात आला नाहीत, तर कारवाई करु, हे खरं आहे का?’ असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला.

‘शरद पवार हेच करायचे, त्यामुळे त्यांना असंच वाटणार. पण त्यांच्या आणि आमच्या राजकारणात फरक आहे (Devendra Fadanvis on Sharad Pawar). पवारांचं राजकारण करण्याची आम्हाला आवश्यकता नाही. काळाचा महिमा पाहा, पवारांनी पक्ष बनवले, तोडले, फोडले, बिघडवले. आज त्यांच्या पक्षासोबत तेच होत आहे. त्यांनी जे केलं, ते त्यांच्याकडे परत आलं’ अशा शब्दात फडणवीसांनी पवारांना टोला लगावला.

‘तुम्ही 21 व्या शतकाचे शरद पवार ठराल का?’ असा प्रश्‍न फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर ते उत्तरले, ‘मी शरद पवार का होऊ? मी तर देवेंद्र फडणवीसच होईन. माझं स्वतःच राजकारण आहे, त्यांच्या राजकीय कूटनीतीची मला गरज नाही. पवारांच्या राजकारणाचं युग आता संपलं आहे, पिढी बदलली आहे. पवारांनी केलेलं राजकारण आता जनता स्वीकारत नाही.’ असंही फडणवीस म्हणाले.

भ्रष्टाचाराचा आरोप नसणारे आमचे राज्यातील पहिलेच सरकार आहे. विरोधक नुसतेच आरोप करतात. पण, पुरावे देऊ शकत नाहीत. मी विरोधी बाकांवर असताना पुराव्यानिशी आरोप करायचो. मात्र, तत्कालीन सरकारांकडून त्यावर कुठली कारवाई केली जात नव्हती, अशी टीकाही फडणवीस यांनी पुढे केली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Poll Dates) निवडणुकांचं बिगुल अखेर 21 सप्टेंबरला वाजलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. महाराष्ट्रातील सर्व 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केेलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा (Maharashtra Assembly Election Announcement) जाहीर केल्या. यासोबतच दोन्ही राज्यांत आचारसंहिता लागू झाली.