Devendra Fadnavis : सरकार अल्पमतात, बहुमत चाचणीचे आदेश द्या; देवेंद्र फडणवीसांच्या पत्रात नेमकं काय?

| Updated on: Jun 28, 2022 | 11:39 PM

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राज्यपालांना पत्र देत सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी भाजपकडून करण्यात आलीय.

Devendra Fadnavis : सरकार अल्पमतात, बहुमत चाचणीचे आदेश द्या; देवेंद्र फडणवीसांच्या पत्रात नेमकं काय?
देवेंद्र फडणवीस, भगतसिंह कोश्यारी
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, आशीष शेलार आदी नेते उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश राज्यपालांनी द्यावे, अशी मागणी करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राज्यपालांना पत्र देत सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी भाजपकडून करण्यात आलीय.

भाजपच्या पत्राच नेमकं काय?

  1. भाजपा-शिवसेनेने एकत्रितपणे निवडणुका लढविल्या होत्या. परंतू निवडणुकीनंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले.
  2. शिवसेनेत गेल्या 8-9 दिवसांपासून अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे आणि त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आता आघाडी नको आहे. शिवसेनेचे 39 आमदार ही आघाडी संपुष्टात येण्याच्या बाजूने आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बहुमत गमावले आहे.
  3. दुसरीकडे शिवसेनेच्या या आमदारांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यांचे 40 मृतदेह गुवाहाटीतून परत येतील, असे जाहीरपणे राज्यसभा सदस्य संजय राऊत सांगत आहेत. शिवाय शिवसेनेचे इतरही नेते अशाच प्रकारची धमकीयुक्त भाषा वापरत आहे. यासंदर्भात सर्व पुरावे सोबत जोडले आहेत.
  4. संसदीय लोकशाहीत सभागृहातील बहुमत ही सर्वोच्च बाब असल्याने आणि त्याशिवाय, ते सरकार अस्तित्त्वात राहू शकत नसल्याने तातडीने मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, ही माझी राज्यपालांकडे विनंती आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे विविध दाखले सुद्धा देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांजवळ आणि सरकारजवळ बहुमत राहिलेलं नाही – फडणवीस

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले की, माननीय राज्यपालांना आज ईमेल द्वारे आणि प्रत्यक्ष अशाप्रकारे भाजपने पत्र दिलेलं आहे. या पत्रात राज्यातील आताच्या परिस्थितीचा उल्लेख केलाय. ज्या बातम्या आम्हाला पाहायला मिळत आहेत. शिवेसनेचे 39 आमदार बाहेर आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत त्यांना राहायचं नाही, असा पवित्रा त्यांनी घेतलाय. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांजवळ आणि सरकारजवळ बहुमत राहिलेलं नाही. त्यामुळे त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगावं. असं पत्र आम्ही राज्यपालांकडे दिलंय. राज्यपालांना दिलेल्या पत्रात आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या काही निर्णयांचा उल्लेख केलाय. त्याआधारे राज्यपाल उचित निर्णय घेतील आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी योग्य तो निर्देश देतील, अशी आम्हाला आशा आहे.