Devendra Fadnavis : सरकार अडीच वर्षे टिकणार आणि पुढेही बहुमतानं येणार, फडणवीसांचा दावा; शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर

| Updated on: Jul 05, 2022 | 6:00 PM

हे सरकार अडीच वर्षे टिकणार आणि पुढेही बहुमतानं निवडून येणार, असा दावा फडणवीस यांनी केलाय. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस आज पहिल्यांदाच नागपुरात दाखल झाले. त्यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

Devendra Fadnavis : सरकार अडीच वर्षे टिकणार आणि पुढेही बहुमतानं येणार, फडणवीसांचा दावा; शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. मात्र, हे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय. तसंच मध्यावधी निवडणुका कधीही लागतील त्यामुळे तयारीला लागण्याचे आदेशही त्यांनी आपल्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना दिलेत. अशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पवार आणि ठाकरेंचा हा दावा फेटाळून लावलाय. हे सरकार अडीच वर्षे टिकणार आणि पुढेही बहुमतानं निवडून येणार, असा दावा फडणवीस यांनी केलाय. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस आज पहिल्यांदाच नागपुरात दाखल झाले. त्यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

‘सरकार अडीच वर्षे टिकणार आणि नव्याने पूर्ण बहुमताने येणार’

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यशस्वीरित्या हे सरकार बनलं आहे. हे सरकार अडीच वर्षे पूर्ण चालेल आणि नव्याने पूर्ण बहुमताने सत्तेत येईल, असा विश्वास मी व्यक्त करतो आणि सर्व जनतेचे आभार मानतो. इतकंच नाही तर फडणवीस एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा प्रस्ताव आपलाच होता असा गौप्यस्फोटही फडणवीस यांना केलाय. मला अतिशय आनंद आहे की आमच्या पक्षाने हा निर्णय केला की आम्ही सत्तेसाठी हापापले नाही. आम्ही आग्रह केला असता तर मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळालं असतं. पण आम्हाला मिळालेलं बहुमत चोरून नेण्यात आलं. त्यामुळे सत्तेसाठी नाही तर विचारासाठी आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करु. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय आम्ही घेतला. पंतप्रधान मोदी, अमित शाह, नड्डासाहेब आणि माझ्या संमतीने हा निर्णय झाला. खरं तर हे प्रपोजल माझं होतं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. मीच आमच्या नेत्यांना सांगितलं होतं की एकनाथ शिंदे यांना आपण मुख्यमंत्री केलं पाहिजे. फक्त त्यावेळी मी बाहेर राहीन असंच ठरलं होतं. मात्र ज्यावेळी राज्यपालांना पत्र देऊन पत्रकार परिषद झाली आणि मी घरी गेलो. त्यावेळी नड्डासाहेबांनी फोन करुन आमचा असा असा विचार असल्याचं सांगितलं. अमित शाह, पंतप्रधान मोदी यांच्याशीही चर्चा झाली. नड्डासाहेबांनी तर पब्लिक स्टेटमेंट दिलं. सरकार चालवायचं असेल तर सरकारबाहेर राहून चालत नाही. त्यामुळे सरकारमध्ये राहण्याच्या त्यांच्या आदेशाचं पालन मी केलं, असं फडणवीसांनी सांगितलं.

शरद पवारांचा दावा काय?

विरोधी पक्षनेता निवडीबाबत शरद पवार यांच्या उपस्थितीत काल महत्वाची बैठक पार पडली. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील असा मोठा दावा केला. राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता आहे. त्यासाठी नेत्यांनी तयार राहावं, असं पवार म्हणाले. पवारांनी हे संकेत देताना फक्त महाराष्ट्राचा उल्लेख केला नाही तर गुजरात आणि महाराष्ट्रात एकाचवेळी निवडणुका होतील असं भाकीतही वर्तवलं आहे.

हिंमत असेल तर मध्यावधी घेऊन दाखवा- उद्धव ठाकरे

एकनाथ शिंदेच्या बंडामुळे शिवसेना दुभंगली आहे. आता डॅमेज कंट्रोलसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कमालीचे सक्रिय झाले आहेत. मुख्यमंत्रीपद सोडावं लागल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आता भाजपला थेट आव्हान दिलं आहे. शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देत भाजपने सत्ता पुन्हा काबीज केलीय. यानंतर उद्धव ठाकरेंना भाजपवर गंभीर आरोपही केलेत. असेल हिंमत तर मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवा, असं थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलंय. तसंच शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रभरातील जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये ते बोलत होते.