देवेंद्र फडणवीसांनी पदभार स्वीकारला, पहिली स्वाक्षरी कशावर?

दादरच्या श्रीमती कुसुम किरण वेंगुर्लेकर यांना एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला

देवेंद्र फडणवीसांनी पदभार स्वीकारला, पहिली स्वाक्षरी कशावर?
| Updated on: Nov 25, 2019 | 2:38 PM

मुंबई : महाराष्ट्रात भाजपचे विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांना हाताशी धरत सत्ता स्थापन केली असली, तरी हा पेच सोडवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकासआघाडीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मात्र त्याचवेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात पदभार (Devendra Fadnavis takes charge) स्वीकारला.

मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार पुन्हा एकदा स्वीकारताच देवेंद्र फडणवीस यांनी पहिली स्वाक्षरीही ठोकली. ही स्वाक्षरी कोणत्या कामासाठी झाली, असा प्रश्न अनेक जणांना पडला आहे. तर फडणवीसांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर स्वाक्षरी केली आहे.

दादरच्या श्रीमती कुसुम किरण वेंगुर्लेकर यांना एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात
आला. यावेळी मुख्य सचिव अजॉय मेहताही उपस्थित होते.

 

सुप्रीम कोर्टात काय झालं?

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीने भाजपच्या सत्तास्थापनेला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयाचे दारं ठोठावली आहेत .(MahaVikas Aaghadi in Supreme Court). महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Government formation) महत्त्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टात झाली. देवेंद्र फडणवीस सरकारच्या बाजूने आणि विरोधात असे जवळपास दीडतास युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाने विश्वासदर्शक ठरावाचा निर्णय मंगळवारी 10.30 पर्यंत राखीव ठेवला आहे.

विश्वासदर्शक ठराव तातडीने होणार की नाही याचा  निर्णय उद्या होणार आहे. त्यामुळे भाजपला पुन्हा एकदा मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेतर्फे कपिल सिब्बल, काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे अभिषेक मनू सिंघवी, अजित पवार यांच्यातर्फे मणिंदर सिंग, भाजपतर्फे मुकुल रोहतगी आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात आपआपली बाजू मांडली.

सकाळी दहा वाजून 35 मिनिटांनी कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात झाली. वकील तुषार मेहता यांनी कोर्टाच्या मागणीप्रमाणे आज ज्यपालांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी दिलेल्या निमंत्रणाचे पत्र आणि देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेसाठी संख्याबळ असल्याचा दावा करणारे पत्र सादर केलं. त्यानंतर  ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आक्रमकपणे भाजपची बाजू मांडली.

Devendra Fadnavis takes charge