दिलेला शब्द पाळला नाही म्हणून विरोधात बसावं लागलं, धनंजय मुंडेंचा भाजपवर हल्लाबोल

| Updated on: Dec 18, 2019 | 4:36 PM

महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सुरु झालेलं हिवाळी अधिवेशन चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षाकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा जोरदार प्रयत्न होत आहे (Dhananjay Munde criticize BJP and Devendra Fadnavis).

दिलेला शब्द पाळला नाही म्हणून विरोधात बसावं लागलं, धनंजय मुंडेंचा भाजपवर हल्लाबोल
Follow us on

नागपूर : महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सुरु झालेलं हिवाळी अधिवेशन चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षाकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा जोरदार प्रयत्न होत आहे (Dhananjay Munde criticize BJP and Devendra Fadnavis). दुसरीकडे सत्ताधारी पक्षातूनही विरोधकांना त्यांनी 5 वर्षांत काय केलं असा सवाल केला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपने दिलेला शब्द पाळला नाही म्हणूनच त्यांच्यावर विरोधात बसण्याची वेळ आली आहे, असं मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं (Dhananjay Munde criticize BJP and Devendra Fadnavis).

धनंजय मुंडे म्हणाले, “भाजपने दिलेला शब्द पाळला नाही. म्हणूनच ते विरोधात बसले आहेत. भाजपला लोकशाहीच कळालेली नाही. भाजपने सत्तेत येण्यासाठी ईडीचा वापर केला, आयकर विभागाच्या धाडी टाकल्या आणि केंद्र सरकारच्या इतर यंत्रणांचा वापर करुन दबाव टाकला. शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी रांगेत उभं केलं. स्वतःच्या सोयीची आकडेवारी देऊन जनतेची दिशाभूल केली. त्यामुळेच तुम्ही विरोधात बसला आहात.”

शिवेंद्रराजे आमच्यासोबत होते तेव्हा सभागृहात दुसऱ्या रांगेत बसत होते. मात्र, आता भाजपमध्ये त्यांना शेवटच्या रांगेत बसावे लागत आहे. भाजपने ज्यांना पक्षात घेतलं त्यांना सडवलं आहे हाच त्यांचा मागील 5 वर्षांचा अनुभव आहे, असाही आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

धनंजय मुंडे म्हणाले, “भाजपला आज मी पुन्हा येईन असं वाटत आहे. त्यांनी उमेद ठेवावी, पण अजून 15 वर्ष तरी ते येऊ शकत नाही. तुम्ही पुन्हा सत्तेत येणार नाही हे सत्य आहे. असं असतानाही तुम्ही थाप मारत आहात. 105 आमदार असूनही त्यांना विरोधात बसावे लागले आहे. कॅगची चौकशीची मागणी केली तर मुख्यमंत्री ती मान्य करतील. मग चंद्रकांत पाटलांना राग का येतो?”

आम्हाला शेतकऱ्यांचा आणि जनतेचा स्वार्थ साधायचा आहे म्हणून महाविकास आघाडी केली. महाराजांचं स्मारकही पूर्ण केलं जाईल. दीड कोटी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचं दिलेलं आश्वासनही पूर्ण केलं जाईल. 72 हजार रिक्त पदांची मेगाभरती देखील लवकरच केली जाईल, अशा अनेक आश्वासनांचाही धनंजय मुंडे यांनी पुनरुच्चार केला.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे बांधावर गेले. पण त्यावेळी तुम्ही सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत होता. सरकार पाडण्यासाठी तुम्ही देव पाण्यात घातले. पण हे सरकार सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले आहे. कितीही मुंगेरी लालची स्वप्नं पाहिली तरी ती पूर्ण होणार नाही, असाही टोला मुंडे यांनी लगावला. धनंजय मुंडे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याच शेरोशायरीच्या भाषेत प्रत्युत्तरही दिले.