ईडी, सीबीआयकडे सत्ताधाऱ्यांविरोधात तक्रारी असूनही कारवाई नाही : पृथ्वीराज चव्हाण

| Updated on: Aug 23, 2019 | 6:08 PM

ईडी (ED) आणि सीबीआयकडे (CBI) सत्ताधारी पक्षाच्या अनेक नेत्यांविरोधात गंभीर तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्यात ईडी आणि सीबीआय कोणतीही कारवाई करताना दिसत नसल्याचं मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.

ईडी, सीबीआयकडे सत्ताधाऱ्यांविरोधात तक्रारी असूनही कारवाई नाही : पृथ्वीराज चव्हाण
Follow us on

मुंबई : ईडी (ED) आणि सीबीआयकडे (CBI) सत्ताधारी पक्षाच्या अनेक नेत्यांविरोधात गंभीर तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्यात ईडी आणि सीबीआय कोणतीही कारवाई करताना दिसत नसल्याचं मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “एकामागोमाग एक सरकारी संस्थांचा गैरवापर सुरू आहे. लोकशाहीच्या सर्व संस्था हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कायद्यानुसार काम करण्याऐवजी सरकारच्या ईच्छेनुसार काम सुरू आहे. हे अत्यंत धोकादायक आहे.”

‘निवडणूकजवळ आल्यावरच अशा चौकशांचे प्रकार, 5 वर्ष काय केलं?’

सरकारी चौकशी संस्था ठराविक लोकांवरच कारवाई करताना दिसत आहे. खरोखरच चौकशी समित्यांनी गुन्हा शोधून गुन्हेगारांवर कारवाई केली आणि त्यांना शिक्षा केली तर आपण समजू शकतो. मात्र, 5 वर्ष काहीच करायचं नाही आणि निवडणूक जवळ आली की हे प्रकार करायचे. जे सरकारचे विरोधक आहेत त्यांच्याविरोधातच कारवाई करायची, असंही चव्हाण यांनी सांगितलं.

‘शिवसेना मंत्रिमंडळ बैठकीत न बोलता बाहेर बोलते हा निव्वळ दांभिकपणा’

पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेच्या पिक विम्यावरील भूमिकेवरही टीका केली. ते म्हणाले, ‘शिवसेना मंत्रिमंडळ बैठकीत काहीच बोलत नाही आणि बाहेर येऊन आपण विरोधी पक्ष आहोत अशी भूमिका घेते. जनतेनं आमदारांना, खासदारांना आपलं काम आपापल्या सभागृहात करावं म्हणून निवडून दिलं आहे. जे मंत्रिमंडळात आहेत त्यांनी मंत्रिमंडळात प्रश्न सोडवले पाहिजेत, निर्णय घेतला पाहिजे. मंत्रीमंडळात काही न बोलता बाहेर बोलणं हा निव्वळ दांभिकपणा आहे.’