राणा, बच्चू कडू वाद मिटवण्यासाठी आता वरिष्ठ पातळीवर प्रयत्न, दोन्ही आमदारांना ‘ही’ महत्त्वाची सूचना
रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामधील वाद वाढतच आहे. आता हा वाद मिटवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई: आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. रवी राणा यांच्याकडून बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे हा वाद चांगलाच पेटला आहे. रवी राणा यांच्या आरोपानंतर बच्चू कडू यांच्याकडून थेट राज्य सरकारलाच इशारा देण्यात आला आहे. रवी राणा यांनी पुरावे सादर करावेत, अन्यथा एक तारखेला वेगळा निर्णय घेऊ असा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता. तसेच आपल्यासोबत सात ते आठ आमदार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. आता या वादाची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली आहे.
माध्यमांपासून दूर राहण्याची सूचना
रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामधील वाद वाढतच आहे. आता हा वाद मिटवण्यासाठी वरिष्ठ पतळीवरून प्रयत्न सुरूच असल्याची माहिती समोर येत आहे. रवी राणा यांच्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला आहे. तर बच्चू कडू यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला आहे. दोन्ही आमदारांनी माध्यमांशी संवाद साधू नये अशा सूचना या रवी राणा आणि बच्चू कडू यांना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
विरोधकांकडून टीका
रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादावर आता विरोधकांकडून देखील टीकेची झोड उठवण्यात येत आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी या वादवारून शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. कोणाला किती खोके मिळाले यावरून आमदारांमध्ये भांडण सुरू झाल्याचा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.