‘विरोधकांचं मनाचे मांडे खाण्याचं काम सुरु’, चंद्रकांतदादांच्या सरकार पडण्याच्या दाव्याची एकनाथ खडसेंनी उडवली खिल्ली

| Updated on: Feb 13, 2022 | 8:24 PM

'चंद्रकांत पाटील हे उत्तम भविष्यकार आहेत. महाविकास आघाडी सरकार पडणार यासाठी त्यांनी अनेकवेळा तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र चंद्रकांत पाटील सत्तेतून बाहेर पडल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. सत्तेत नसल्याने त्यांना वन-वन फिरावे लागत आहे. त्यामुळेच ते अशाप्रकारचं वक्तव्य करत आहेत, अशी टीका खडसे यांनी केलीय.

विरोधकांचं मनाचे मांडे खाण्याचं काम सुरु, चंद्रकांतदादांच्या सरकार पडण्याच्या दाव्याची एकनाथ खडसेंनी उडवली खिल्ली
एकनाथ खडसे, चंद्रकांत पाटील
Follow us on

जळगाव : महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) 10 मार्चनंतर कोसळणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलाय. पाटील यांच्या या दाव्यावर आता महाविकास आघाडीचे नेते जोरदार टीका करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनीही चंद्रकांत पाटलांच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. ‘चंद्रकांत पाटील हे उत्तम भविष्यकार आहेत. महाविकास आघाडी सरकार पडणार यासाठी त्यांनी अनेकवेळा तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र चंद्रकांत पाटील सत्तेतून बाहेर पडल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. सत्तेत नसल्याने त्यांना वन-वन फिरावे लागत आहे. त्यामुळेच ते अशाप्रकारचं वक्तव्य करत आहेत, अशी टीका खडसे यांनी केलीय.

‘बहुमतापेक्षाही कितीतरी अधिक आमदार महाविकास आघाडीकडे आहेत. सरकार पाडायचा विचार केला आणि दुर्दैवानं सरकार पडलंच तर बहुमताच्या जोरावर पुन्हा हेच सरकार येणार. सरकार पाडण्यासाठी ठोस कारण असलं पाहिजे. विरोधक मनाचे मांडे खात आहेत. जोपर्यंत तिन्ही पक्षाचे बहुमत आहे, तोवर हे सरकार पडणार नाही’, असा दावाही खडसेंनी केलाय.

‘दारुबाबत भाजपची भूमिक दुटप्पी’

वाईन विक्रीच्या सरकारच्या धोरणाबाबत विचारलं असता खडसे म्हणाले की, वाईनबाबत एकजण विरोध करतोय तर दुसरे स्वागत करत आहेत. वाईन ही दारू आहे त्यामुळे आण्णा हजारे यांनी विरोध केला आहे. मध्यप्रदेशात मॉलमध्ये बियर विकायला भाजप सरकारने परवानगी दिली. आंध्र प्रदेशात भाजपला निवडून दिलं. तर दारूही गरिबांच्या हिताची असल्यानं पन्नास रुपयांमध्ये दारू देऊ, असं वक्तव्य तेथील प्रदेश अध्यक्षांनी केलं आहे. त्यामुळे वाईनबाबत भाजपची दुटप्पी भूमिका का? असा सवाल खडसे यांनी केलाय.

‘खडसेंकडून बच्चू कडू यांची पाठराखण’

एका प्रकरणात राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याबाबत विचारलं असता “मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. पण बच्चू कडू हे वरच्या न्यायालयात दाद मागणार आहेत. वरच्या न्यायालयात काय निर्णय लागतो याची वाट पाहिली पाहिजे, असं म्हणत खडसे यांनी बच्चू कडू यांची पाठराखण केलीय.

इतर बातम्या :

Video : ‘नाना.. हिंमत असेल तर सागर बंगल्यावर येऊन दाखव’, प्रसाद लाड यांच्याकडून एकेरी उल्लेख, पटोलेंना थेट आव्हान

‘शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार नसतील तर गप्प बसून चालणार नाही’, राजू शेट्टींनी महाविकास आघाडीविरोधात दंड थोपटले?