Eknath Shinde : शिंदे गटाकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, बच्चू कडूंसह 10 आमदार उद्या मुंबईत? राज्यपालांना पत्र देणार

| Updated on: Jun 28, 2022 | 6:06 PM

शिंदे गटाकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. बच्चू कडू यांच्यासह 10 आमदार उद्या मुंबईत येऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार अल्पमतात आल्याचं पत्र देणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Eknath Shinde : शिंदे गटाकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, बच्चू कडूंसह 10 आमदार उद्या मुंबईत? राज्यपालांना पत्र देणार
Follow us on

मुंबई : राज्याच्या राजकारणाला येत्या दोन दिवसात मोठी कलाटणी मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचं आवाहन केलं जातंय. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांना आज समोर येऊन चर्चेचं आवाहन करण्यात आलंय. एक दिवसांत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घ्या, असं अल्टिमेटम शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना देण्यात आलंय. या सर्व पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यासह 10 आमदार उद्या मुंबईत येऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार अल्पमतात आल्याचं पत्र देणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बच्चू कडू हे 10 आमदारांसह उद्या मुंबईत येतील. त्यानंतर ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याचं पत्र ते देण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनीही शिवसेनेच्या आमदारांपेक्षा अपक्ष आमदार राज्यपालांना पत्र देतील असं म्हटलं होतं. त्यानंतर प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू हे 10 आमदारांसह उद्या राज्यपालांना भेटतील असं सांगितलं जात आहे.

केंद्र सरकार सुरक्षा पुरवणार

दरम्यान शिवसेनेच्या नेत्यांकडून बंडखोर आमदारांना धमकीवजा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे उद्या बच्चू कडू आणि अन्य आमदार मुंबईत येणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार या आमदारांना सुरक्षा पुरवण्याची शक्यता आहे. शिवसैनिकांनी आक्रमक होऊन कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नये, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी महाराष्ट्र पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून बंडखोर आमदारांना मुंबईत सुरक्षा पुरवली जाण्याची शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना

राज्याची मंत्रिमंडळाची बैठक  आज पार पडली. या बैठकीला सर्व कॅबिनेट आणि पहिल्यांदाच या बैठकीला राज्यमंत्र्यांची उपस्थिती होते. या बैठकीत मुख्यमंत्री व्हीसीद्वारे सहभागी झाले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ यांनाही कोरोना झाल्यामुळे तेही व्हीसीद्वारे या बैठकीत सहभागी झाले. या बैठकीत मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो संपूर्ण मंत्रिमंडळाला मान्य असेल असा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय.