AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : नव्या सत्ता स्थापनेचा मुहूर्त सापडला, आषाढ अमावस्येनंतरच प्रस्ताव देणार; शिंदे-फडणवीसांचं राज्य येणार?

Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस आणि जेठमलानी यांची जेपी नड्डा यांच्यासोबत भेट झाली. त्यांच्यात प्रदीर्घ चर्चाही झाली. आता फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Eknath Shinde : नव्या सत्ता स्थापनेचा मुहूर्त सापडला, आषाढ अमावस्येनंतरच प्रस्ताव देणार; शिंदे-फडणवीसांचं राज्य येणार?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 28, 2022 | 5:40 PM
Share

मुंबई: राज्यातील ठाकरे सरकार जाणार असल्याची जवळजवळ चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) कोणत्याही क्षणी राजीनामा देत असल्याची घोषणा करण्याची शक्यता असल्याने राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत. यावेळी सत्तेचा फॉर्म्युला ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) हे सुद्धा दिल्लीत जाणार असल्याचं सांगितलं जातं. शिंदे हे दिल्लीत फडणवीस आणि नड्डा यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. यावेळी आषाढ अमावस्येनंतरच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना सत्ता स्थापनेचा प्रस्ताव देण्यावर चर्चा केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राज्यात लवकच फडवणवीस आणि शिंदेंचं राज्य पाहायला मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी सांगितलं.

आषाढ अमावस्येनंतर सत्ता स्थापनेचा प्रस्ताव राज्यपालांना दिला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. बुधवारी सकाळी 8.41 नंतरचा सरकार स्थापनेचा मुहूर्त असेल असंही सांगितलं जातं. त्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होत असल्याचंही सांगितलं जात आहे.

अमित शहांना भेटणार

देवेंद्र फडणवीस आणि जेठमलानी यांची जेपी नड्डा यांच्यासोबत भेट झाली. त्यांच्यात प्रदीर्घ चर्चाही झाली. आता फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. शहा यांच्यासोबतच्या भेटीत नव्या सत्तेच्या फॉर्म्युल्यावर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय राज्यातील राजकीय परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था यावरही चर्चा होईल. तसेच बंडखोर आमदारांना संरक्षण देण्याबाबतचीही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री राजीनामा देणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणत्याही क्षणी राजीनामा देण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटची बैठक बोलावली आहे. त्यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा केली. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही त्यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे ठाकरे आजच राजीनामा देणार असल्याच्या चर्चांनी अधिकच जोर धरला आहे.