कॅबिनेटची नोट तयार होती, पण फक्त काँग्रेसला श्रेय मिळेल म्हणून निर्णय घेतला नाही : मनसे

| Updated on: Nov 19, 2020 | 3:55 PM

लॉकडाऊनमधील वीज बिलं कमी करण्याबाबत कॅबिनेटची नोट तयार झाली होती, पण याचं काँग्रेसला श्रेय मिळेल म्हणून हा निर्णय घेण्यात आला नाही, असाही दावा मनसेने केलाय.

कॅबिनेटची नोट तयार होती, पण फक्त काँग्रेसला श्रेय मिळेल म्हणून निर्णय घेतला नाही : मनसे
Follow us on

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीजबिलं आली. यानंतर राज्य सरकारकडून जनतेचा असंतोष कमी करण्यासाठी वीजबिलं कमी करण्याचं आश्वासनही देण्यात आलं. मात्र, आता राज्य सरकारने वीज बिलं कमी होणार नसल्याची भूमिका घेतील. यानंतर राज्यातील राजकारणाचा पारा चढला आहे. यात मनसेने आक्रमक भूमिका घेत सरकारला अल्टिमेटच दिलाय. लॉकडाऊनमधील वीज बिलं कमी करण्याबाबत कॅबिनेटची नोट तयार झाली होती, पण याचं काँग्रेसला श्रेय मिळेल म्हणून हा निर्णय घेण्यात आला नाही, असाही दावा मनसेने केलाय. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज (19 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत मनसेची भूमिका स्पष्ट केली (Electricity Bill issue is pending due to Credit War of Congress and Thackeray Government claim MNS).

वीजबिलात माफी देण्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारने राज्यातील साडेअकरा कोटी जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे जनतेत संतापाची भावना आहे. सोमवारपर्यंत बील माफ करा, अन्यथा राज्यात जिल्ह्या-जिल्ह्यात जनांदोलन करण्यात येईल, असा इशारा बाळा नांदगावकर यांनी दिला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडल्यानंतर नांदगावकरांनी मनसेचे भूमिका जाहीर केली. या बैठकीत वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बाळा नांदगावकर म्हणाले, “राज्यातील जनतेला वाढीव वीजबिल आले. सरकारने हे बील कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं. आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून ते शरद पवारांपर्यंत सर्वांना निवेदनं दिली. पण वीजबिल माफ झाली नाही. उलट ऊर्जामंत्र्यांनी शब्द फिरवून महाराष्ट्राचा घोर अपमान केला. त्यामुळे राज्यातील जनतेची फसवणूक झाली असून जनतेत संतापाची भावना आहे. त्यामुळे आम्ही सरकारला येत्या सोमवारपर्यंत वीजबिल माफ करण्याचा अल्टिमेटम देत आहोत.”

“जर वीजबिल माफ नाही केलं, तर सोमवारनंतर जिल्ह्याजिल्ह्यात उग्र आंदोलनं होतील. लोकांचा संयम सुटला आहे. यानंतर जे होईल त्याला जबाबदार सरकारच असेल. तसेच कुणाची वीज कापल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही,” असा इशाराही दिला.

आंदोलनात कोणीही येऊ शकतो

भाजपनेही मनसेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता नांदगावकर यांनी हा प्रश्न सर्वांचाच आहे. त्यामुळे या आंदोलनात कुणीही येऊ शकतो. भाजपच काय काँग्रेस आणि राष्ट्रवादीही या आंदोलनात सहभागी होऊ शकते. त्यांनाही वाढीव वीजबिल आलंच आहे, असं ते म्हणाले. तसेच भाजप-मनसे युतीबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला. हा विषय माझ्या अख्त्यारीत येत नाही, असं सांगून या प्रश्नावर बोलणं त्यांनी टाळलं.

पवारांच्या शब्दाला किंमत उरली नाही

मनसेचं शिष्टमंडळ ऊर्जामंत्र्यांना भेटले, त्याशिवाय ऊर्जा सचिव, बीएमसी अधिकाऱ्यांना भेटले. अदाणी ग्रुपचे अधिकारी राज ठाकरेंना भेटले. राज ठाकरे स्वत: राज्यपालांना भेटले. राज्यपालांनी त्यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना भेटण्यास सांगितलं. त्यानंतर राज ठाकरे हे शरद पवारांशी बोलले. पवारांनी राज ठाकरेंकडून निवेदनं मागवली. आम्ही ही निवेदनं दिली. तरीही त्यावर निर्णय घेतला गेला नाही. आता तर वीजबिल माफ करणार नसल्याचं ऊर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पवारांच्या शब्दाला राज्य सरकारमध्ये किंमत उरलेली दिसत नाही, असा टोला नांदगावकर यांनी लगावला. (Electricity Bill issue is pending due to Credit War of Congress and Thackeray Government claim MNS)

संबंधित बातम्या:

‘बीएमसी’ निवडणुकीत शिवसेनेशी युती नको, काँग्रेस स्वबळावर : रवी राजा

केडीएमसी घंटागाडी 5 कर्मचाऱ्यांना मारहाण, काम बंद आंदोलनामुळे शहरात कचऱ्याचे ढीग

राज ठाकरेंच्या वीजबिल माफीच्या आंदोलनात भाजपही; बावनकुळेंचं मोठं विधान

संबंधित व्हिडीओ :