BJP Executive Committee | पंकजा मुंडेंना राज्यातील राजकारणातून वगळलं जातयं का?

| Updated on: Jul 03, 2020 | 6:51 PM

पंकजा मुंडे यांना राज्यातील राजकारणातून वगळलं जातंय का, अशी चर्चा राजकारणात सुरु झाली (Pankaja Munde Not Inclusion In BJP executive committee) आहे.

BJP Executive Committee | पंकजा मुंडेंना राज्यातील राजकारणातून वगळलं जातयं का?
Follow us on

मुंबई : राज्याचं लक्ष लागलेल्या भाजपची महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर (Pankaja Munde Not Inclusion In BJP executive committee) झाली. माजी मंत्री पंकजा मुंडे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान मिळालेलं नाही. त्यांना केंद्राच्या कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. यानंतर पंकजा मुंडे यांना राज्यातील राजकारणातून वगळलं जातंय का, अशी चर्चा राजकारणात सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘टीव्ही 9 मराठी’ने अनेक नेते तसेच राजकीय विश्लेषकांकडून त्यांची मतं जाणून घेतली.

जयदेव डोळे – राजकीय विश्लेषक 

“पंकजा मुंडे यांना सतत दूर ठेवलं जातं आहे. मंत्री धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिमंडळात आहेत. पुढे त्यांच्यामागे राष्ट्रवादी आहे, तोपर्यंत पंकजा मुंडेंना काही स्थान नाही. आता त्यांची बहिण प्रितम मुंडे खासदार आहेत. त्या दिल्लीत आणि पंकजाही दिल्लीत. समजा केंद्रात काही किंवा पक्ष कार्यकारणीच्या बाकी जबाबदारी स्वीकारुन महाराष्ट्राबाहेर गेल्या तर मग महाराष्ट्रात काही नवं नेतृत्व देण्याचा विचार भाजपचा दिसतो,” असे मत राजकीय विश्लेषक जयदेव डोळे यांनी व्यक्त केलं.

“एकदा पंकजा मुंडेंचा अडसर दूर झाला तर मग आता जे नव्याने जे उभे केलेले नेते आहेत, त्यांना काही तरी आकलन येईल आणि त्यांना काही तरी वजन निर्माण येईल, असे दिसते. पण हा पंकजा मुंडेंना बाजूला काढण्याचा विचार दिसतो.”

“एक कारण म्हणजे पंकजा मुंडे या मूळ हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी आणि कट्टर स्वरुपाच्या राजकारणी आहेत. त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांनीही खडतर हिंदुत्वावादी भूमिका निभावली होती. पण ते राजकीय पुढारी नव्हते. त्यामुळे पंकजा मुंडेंचा काहीही वापर भाजपच्या राजकारणासाठी होत नव्हता. त्यातून देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे जमेनासे झाले होते.”

“त्यामुळे दिल्लीत एखादी संधी द्यावी. त्यांना हिंदी, इंग्रजी भाषा येते. त्यांच्याकडे अनुभव आहे, त्यामुळे त्यांना एक संधी मिळू शकते. त्यांनी त्या संधीची सोने केले तर मराठवाड्यासाठी त्यांना काही करता येईल,” असेही जयदेव डोळे म्हणाले.

जयंत माईनकर (ज्येष्ठ पत्रकार)

“एकप्रकारे राज्यातून राजकीय विरोधकांना किंवा ज्यांचं आपल्यासमोर उभं राहण्याची क्षमता आहे, अशा व्यक्तींना दूर करण्याचा हा प्रयत्न आहे. गोपीनाथ मुंडेंचा एक ग्रुप होता. त्या ग्रुपचे नेतृत्व पंकजा मुंडे करत आहेत. त्यांचा पराभव झालेला आहे, त्यांना विधानपरिषदेत पाठवायचं नाही. मग पंकजा मुंडेंना राजकीय पुर्नवसन करण्यासाठी केंद्रातील तथाकथित मोठी जबाबदारी मिळाली तरी पंतप्रधान आणि अध्यक्ष या पदाशिवाय इतर जबाबदारीला फारसं स्थान नसतं. ते एक प्रकारचं दाखवण्यासाठी असते. त्यामुळे पंकजा मुंडेंची राजकीय बोळवण केलेली आहे,” असे ज्येष्ठ पत्रकार जयंत माईनकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितले.

केशव उपाध्ये (भाजप मुख्य प्रवक्ते)

“चंद्रकांत पाटील यांनी याबद्दल आताच माहिती दिली आहे. केंद्राकडून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे केंद्रातील कार्यकारणी लवकरच जाहीर होणार आहे. त्या या कोअर टीममध्ये आहे. त्यामुळे त्यांना डावलण्याचा विषय नाही. उलट त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने स्थान आहे, हे आजच्या निर्णयाने स्पष्ट होतं,” असे भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले.

“कार्यकारणी हे सर्व विचार करुन ठरवली जाते. यात त्यांचे मार्गदर्शन, अनुभव याचा फायदा पक्षाला होतो या दृष्टीकोनातून ठरवली जाते. मात्र यात कुठेही कोणाला डावलण्याचा, नाकारण्याचा हेतू नाही. उलट सर्वांना चांगली संधी पक्षाने दिली आहे.

पंकजा मुंडे या आमच्या नेत्या आहे. पक्षात त्या कोअर कमिटीतही आहेत. त्यामुळे त्यांचं नेतृत्व महाराष्ट्रातही राहिलं आणि केंद्रात त्यांना अधिक चांगला रोल दिला जाईल. त्यामुळे त्याचं स्वागत व्हायला हवं,” असेही केशव उपाध्ये (Pankaja Munde Not Inclusion In BJP executive committee) म्हणाले.

हेही वाचा : भाजपची कार्यकारिणी जाहीर, प्रीतम मुंडे राज्यात, पंकजा मुंडे केंद्रात

चित्रा वाघ (भाजप उपाध्यक्ष)

“पंकजा मुंडेंना केंद्रात जाण्याची मोठी संधी आहे. त्या आमच्या नेत्या आहेत. महाराष्ट्रात त्यांचं काम आहे. मात्र त्या आणखी उभारणीला येतील. त्यासोबत देशातही आणखी चांगल काम त्यांच्या माध्यमातून होईल, अशी मला आशा आहे,” असेही भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ म्हणाल्या.

“त्या राज्याच्या नेत्या आहेत. त्यांनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून अतिशय चांगलं प्रभावी काम केलं आहे. जर त्यांना केंद्राने काही मोठी जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला असेल तर ही मोठी गोष्ट आहे,” असेही चित्रा वाघ यांनी म्हटलं.

राम शिंदे (भाजप उपाध्यक्ष)

“चंद्रकांत पाटील यांनी सर्व विचार करुन ही कार्यकारणी जाहीर केली असेल. पण पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, विनोद तावडे यांची पक्ष नेतृत्व निश्चित चांगल्या पद्धतीने दखल घेईल. शेवटी राज्यात बहुमत मिळूनही विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विरोधी पक्षात सक्षम पद्धतीने काम करुन येत्या काळात राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी सर्वांची गरज लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक नेत्याची योग्य ती दखल पक्षाने घेतली आहे. भविष्यकाळात ती जबाबदारी घेतील,” असं मत भाजपचे उपाध्यक्ष  राम शिंदे यांनी व्यक्त केलं.

“चंद्रकांत पाटील यांनी आधीच सर्व काही सांगितलं आहे. त्यामुळे कोणालाही डावललं हे होत नाही. केंद्रात काम करुनही राज्यात लक्ष ठेवता येतं. प्रमोद महाजन यांनीही अशाच पद्धतीने काम केलं. पंतप्रधान मोदी हेही केंद्रात काम करत होते. नंतर गुजरातमध्ये आले. भाजपमध्ये इतर पक्षांसारखे नाही. या ठिकाणी सामुहिक निर्णय होत असतात. याची प्रचिती आता आली आहे, पुढेही येईल.”

“पंकजा मुंडेंचे राज्यातील राजकारण संपले असे समजण्याचे काहीही कारण नाही. राजकारण असं नसतं ते संपलं नाही आणि संपणारही नाही,” असेही भाजप उपाध्यक्ष राम शिंदे म्हणाले.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले? 

“पंकजा मुंडे यांना केंद्रामध्ये चांगली जबाबदारी मिळणार आहे. केंद्राने असं सूचवलं की, केंद्रामध्ये त्यांना जबाबदारी देत आहोत. त्यामुळे पंकजा आमच्या कोअर कमिटीच्या 100 टक्के सदस्या असतील. त्या आमच्याबरोबरच राहतील. पण महाराष्ट्रात वेळ देणं बरोबर नाही, कारण त्यांनी केंद्रात वेळ द्यावा, अशी केंद्राची अपेक्षा आहे. केंद्राची जबाबदारी महाराष्ट्राच्या कोअर कमिटीच्या सदस्यांना शंभर टक्के असेल”, असं चंद्रकांत पाटील (Pankaja Munde Not Inclusion In BJP executive committee) म्हणाले.

संबंधित बातम्या : 

राष्ट्रवादीतून आलेल्या चित्रा वाघ यांना भाजपमध्ये महत्त्वाची जबाबदारी

पंकजांनी महाराष्ट्रात वेळ देणं बरोबर नाही, ही तर केंद्राची इच्छा : चंद्रकांत पाटील