“मी एक दिवसाचा मुख्यमंत्री होतो, तुम्ही एक दिवस शेतकरी होऊन दाखवा”

| Updated on: Nov 03, 2019 | 11:46 PM

दुष्काळाने होरपळणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाने सुखद धक्का दिला असला तरीही बेमोसमी पावसाच्या अतिरेकाने शेतकऱ्यांची स्थिती (Farmer challenge CM Fadnavis) होत्याची नव्हती झाली आहे.

मी एक दिवसाचा मुख्यमंत्री होतो, तुम्ही एक दिवस शेतकरी होऊन दाखवा
Follow us on

सोलापूर : दुष्काळाने होरपळणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाने सुखद धक्का दिला असला तरीही बेमोसमी पावसाच्या अतिरेकाने शेतकऱ्यांची स्थिती (Farmer challenge CM Fadnavis) होत्याची नव्हती झाली आहे. त्यातच सरकार स्थापनेवरुन राज्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशात शेतकऱ्यांपर्यंत योग्य ती मदत पोहचण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप होत आहे. या स्थितीवरुन एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना मी एक दिवसाचा मुख्यमंत्री होतो, तुम्ही एक दिवस शेतकरी होऊन दाखवा, असं म्हणत थेट आव्हान (Farmer challenge CM Fadnavis) दिलं आहे.

बालाजी शिनगारे असं या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. बालाजी शिनगारे आणि महेश मुकटे हे बार्शी तालुक्यातील कांदलगाव येथे शेती करतात. त्यांनी मागील 5 वर्षांत बेरोजगारीला कंटाळून पारंपरिक शेती करण्याचा निर्णय घेतला. ते रात्रंदिवस शेतीत मेहनत घेत आहेत. मात्र, परतीच्या पावसाने या सर्व कष्टांची पुन्हा माती झाली, अशी भावना ते व्यक्त करत आहेत.

“राज्यकर्त्यांचा सत्तास्थापनेचा घोळ मिटेना, तर हे शेतकऱ्याकडं कधी बघणार आहेत. त्यांचं फक्त खुर्चीसाठी भांडण सुरू आहे. मुख्यमंत्री माझा की तुझा हेच भांडण सुरू आहे. तुम्ही शेती करुन बघा. मी एक दिवसाचा मुख्यमंत्री होतो, तुम्ही एक दिवसाचा शेतकरी होऊन दाखवा. मग तुम्हाला कळेल शेतकऱ्याच्या काय वेदना असतात. जर तुम्ही एक दिवस शेतकरी होऊन दाखवलं तर तुमची पाठ थोपटवतो.”

“कांदा सडका असतो हे ऐकलं होतं, पण सरकारही सडकंच”

शेतकऱ्याची स्थिती अत्यंत खराब आहे. हे शेतकऱ्याच्या विरोधातील सरकार आहे. शेतकरी मरायला लागला आहे. कांदा सडला आहे. आम्ही मरायचं की जगायचं. कांदे काढायला कामगार मिळेना. माझी शाळेतील मुलं घेऊन आलो आहे कांदे उपटायला. शेती अजिबात परवडेनासी झाली आहे. कांदा सडका असतो हे ऐकलं होतं, पण सरकार पण सडकंच आहे हे माहिती नव्हतं, अशी संतप्त प्रतिक्रिया देखील शिनगारे यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी आपल्या शेतातील कांदे उपटून प्रत्येक कांदा सडलेला असल्याचंही दाखवलं.

आधी कोरडा दुष्काळ आणि आता ओला दुष्काळाने (अतिवृष्टी) शेतकऱ्यांना भुईसपाट केले आहे. एकिकडे शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे, तर दुसरीकडे ज्यांना माय-बाप सरकार म्हणून निवडून दिलं ते मुख्यमंत्रीपदावरुन भांडत आहेत. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी विलंब होत आहे. शेतकऱ्यांच्या हातात काहीही लागत नसताना राज्यकर्ते नुकसान पाहणीचे इव्हेंट करत आहेत, असाही आरोप होत आहे. यावर संतापून शेतकरी आम्हाला मदत नको. फक्त एक दिवस आमच्या जागी राहून बघा, अशी भावना व्यक्त करत आहेत.