‘मविआ’ला समर्थन दिल्याचे वाईट वाटतं; औरंगाबादचं नाव बदलून काय संदेश दिला, अबू आझमींचा सवाल

| Updated on: Jul 03, 2022 | 1:57 PM

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून अबू आझमी यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. नाव बदलून काय संदेश द्यायचा आहे? असा सवाल आझमी यांनी उपस्थित केला आहे.

मविआला समर्थन दिल्याचे वाईट वाटतं; औरंगाबादचं नाव बदलून काय संदेश दिला, अबू आझमींचा सवाल
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : आज विधानसभा अध्यक्षांची निवडणूक पार पडली. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे विधानसभेचे नवे अध्यक्ष झाले आहेत. राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदन ठारावावेळी बोलताना अबू आझमी (Abu Azmi) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर निशाणा साधला आहे. विधानसभा अध्यक्षपद राज्यपालांनी अडवून धरलं होतं, हे पद बहुमतापेक्षाही घटनेनं चालणं गरजेचे आहे. मात्र तसे होऊ शकले नाही. मोठे पक्ष आपली कामं बरोबर करवून घेतात, पण छोट्या पक्षांची अवस्था वाईट आहे. त्यांना साधी बोलण्याची संधी देखील मिळत नाही.  आम्ही बोलायला उभे राहिलो की दोन मिनिटांत घंटी वाजवली जाते अशी खंत आझमी यांनी व्यक्त केली आहे. सोबतच त्यांनी नामांतराच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारवर देखील निशाणा साधला. महाविकास आघाडीला समर्थन दिल्याचे वाईट वाटते असे आझमी यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले आझमी

उद्धव ठाकरे यांनी आपल्या शेवटच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याने उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीच्या आधीच राजीनामा दिला. नामांतराच्या मुद्यावरून अबू आझमी यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. औरंगाबादचं नाव बदलून तुम्हाला काय संदेश द्यायचाय असा सवाल आझमी यांनी उपस्थित केला. तसेच आम्ही महाविकास आघाडीला समर्थन दिले याचे वाईट वाटत असल्याचे आझमी यांनी म्हटले आहे. जुन्या शहरांचे नाव बदलून काय फरक पडणार आहे. जर तुम्ही एखादे नवे शहर वसवले असते तर गोष्ट वेगळी होती असे आझमी यांनी म्हटले आहे. दरम्यान अबू आझमी यांचे भाषण सुरू असतानाच अभिनंदन ठरावावर बोलावं असे आवाहन त्यांना विधानसभा अध्यक्षांकडून करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

आम्हाला बोलण्याची संधीही मिळत नाही

विधान भवनात छोट्या पक्षांची अवस्था वाईट असते, मोठे पक्ष आपली कामं बरोबर करवून घेतात. छोट्या पक्षांना साधी बोलण्याची संधी देखील दिली जात नाही. आम्ही बोलायला उभे राहिलो की दोन मिनिटांत घंटी वाजवली जाते अशी खंतही यावेळी आझमी यांनी व्यक्त केली आहे.