Uddhav Thackeray : ‘हे नालायक, नीच लोकं..’ मनातली खदखद मांडताना उद्धव ठाकरे सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले
Uddhav Thackeray : "शिवसेनाप्रमुख म्हणाले एकच दिवस वाघ बनून जगा. त्यांना वाटतं फुटल्यावर शिवसैनिक काही करत नाही. आता शिवसैनिक काय असतो त्याचा राग दाखवा. नऊ पैकी सहा खासदार फुटले. तीनच राहिले"

नुकताच महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडला. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले. लोकसभा निवडणुकीनंतर दोन वर्षात ठाकरे गटात फूट पडली. त्याआधी 2022 साली 40 आमदार फुटले होते. आता नऊ पैकी सहा खासदार फुटणं हा उद्धव ठाकरे यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी मोठा धक्का आहे. उद्धव ठाकरे यांना याची कल्पना आहे. म्हणूनच त्यांनी फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात दौरे सुरु केले आहेत. यवतमाळ, परभणी, धाराशिव त्यानंतर आज ते शिर्डीमध्ये आले आहेत. शिर्डीमधील ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे फुटले. आज शिर्डीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर टीका केलीच. पण भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना यांच्यावर सुद्धा निशाणा साधला.
“राज्यात आणि देशात नेभळट कारभार सुरू आहे. फोडाफोडी सुरू आहे. नीटचा पेपर फुटला. तुमचीही मुलं नीटला असतील. त्यांच्या अपेक्षाचं काय? शेतकऱ्याकडे बैल नाही. पण हे नालायक, नीच लोकं खासदार फोडायला लागले आहेत” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मनातली खदखद व्यक्त केली. “बातमी आल्यावर बैल दिला. बैल कशाला दिला. एखादा खासदार द्यायचा. मंत्री द्यायचा ना. माजलेले आहेत ते. बैल दिला तोही नांगराच्या भाराने बसला. बैलाला नांगराचा भार पेलवत नाही. पण शाहा सेनेलाला पैशाचा भार पेलवत नाही. कालपर्यंत टीईटीचा पेपर फुटला. तुमच्या संतापाला वाचा का फुटत नाही? हा प्रश्न विचारायला आलो आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
अरे सूर्योदय होतच असतो
“शिवसेनाप्रमुख म्हणाले एकच दिवस वाघ बनून जगा. त्यांना वाटतं फुटल्यावर शिवसैनिक काही करत नाही. आता शिवसैनिक काय असतो त्याचा राग दाखवा. नऊ पैकी सहा खासदार फुटले. तीनच राहिले. म्हणाले, आता शिवसेना संपली. माझ्याकडे चार खासदार आहेत. मला त्यांचा अभिमान आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “त्यांना काही पैशाचे अमिष आले नव्हते का. राजाभाऊंचे वडील प्रकाभाऊंनी सांगितलं आम्ही घरी बसू. पण ज्यांनी निवडून दिलं त्यांच्याशी गद्दारी करणार नाही. प्रकाशभाऊ वाजेंचा अभिमान वाटतो. याला म्हणतात निष्ठा. अरे सूर्योदय होतच असतो. आज अंधार आहे. उद्या उजेड असतोच” असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
