मी राष्ट्रवादी सोडण्याचं कारण पवारांना माहित, त्यांनी सुनावलं तर गप्प बसेन : गणेश नाईक

माझ्यावर आमदारकीमुळे अन्याय झाला, म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला, असा दावा भाजप आमदार गणेश नाईक यांनी केला. Ganesh Naik on Sharad Pawar

मी राष्ट्रवादी सोडण्याचं कारण पवारांना माहित, त्यांनी सुनावलं तर गप्प बसेन : गणेश नाईक
Anish Bendre | Updated on: Mar 09, 2020 | 9:01 AM

नवी मुंबई : शरद पवारांना माहिती आहे, की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का सोडला. त्यांनी अधिकाराने मला सुनावलं, तर मी गप्प बसेन, असं उत्तर भाजप आमदार गणेश नाईक यांनी दिलं. राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत शाब्दिक वादावादी झाल्यानंतर नाईकांनी भावना व्यक्त केल्या. (Ganesh Naik on Sharad Pawar)

‘माझ्यावर आमदारकीमुळे अन्याय झाला, म्हणून मी पक्ष सोडला. मी राष्ट्रवादीमध्ये 20 वर्ष काम केलं होतं. मला आतापर्यंत शरद पवार काहीही बोलले नाहीत. त्यांनाही माहित आहे, की मी पक्ष कशासाठी सोडला. मलाही माहिती आहे, की मी काय गमावलं’, असं गणेश नाईक नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

‘मला इन्कम टॅक्स, ईडी किंवा कुठल्याही गुंडाकडून भीती नाही. माझा हात साफ आहे. मला आमदार आणि नामदार व्हायचं नव्हतं. शरद पवारांनी अधिकाराने मला काही सुनावलं, तर मी काहीच बोलणार नाही’, असं नाईक म्हणाले.

नाईक विरुद्ध आव्हाड, नेमकं काय झालं? वाचा : “ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल”, गणेश नाईकांचा आव्हाडांवर पलटवार

‘माझ्यावर आमदारकीमुळे अन्याय झाला. त्यामुळे पुत्र संदीप नाईक, संजीव नाईक यांनी सांगितलं की तुम्ही पक्षासाठी 20 वर्ष काम केलं, तुम्हाला तिकीट नाही मिळालं, तर आम्ही सगळे पक्ष सोडणार. त्यामुळे आम्ही पक्ष सोडला, अशी कबुली गणेश नाईक यांनी दिली.

गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या जाहीर कार्यक्रमात आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल वाच्यता केली आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

“काय केले या नाईकांनी. जे झाले ते काँग्रेसच्या माध्यमातून झाले. आता दिवस संपले. माझे देखील आयुष्य यांनी खराब केलं, माझे कुटुंब देखील खराब केलं, शरद पवार यांना सांगितले आम्ही जाणार नाही आणि भाजपात गेले. अशा गद्दारांना मी विचारत नाही”, असं म्हणत आव्हाडांनी नाईक पिता-पुत्रांवर ताशेरे ओढले होते.

“इमारतींचे आणि इतर कंत्राट कोणाकडे. खंडणी आणि धमकी या नवी मुंबईत कोणाचे चालते या गणेश नाईक यांचे. एवढीच श्रीमंती असेल तर जागा गरिबांना कधी देणार”, असं म्हणत आव्हाडांनी गणेश नाईकांवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

गणेश नाईकांनी काय प्रत्युत्तर दिलं?

जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला गणेश नाईक यांनी कालच प्रत्युत्तर दिलं होतं. “ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक”, हा नाना पाटेकर यांच्या सिनेमातील डायलॉग म्हणत गणेश नाईक यांनी आव्हाडांवर पलटवार केला होता.

“कोणी मुंबईवरुन, कोणी ठाण्यावरुन, कोणी पुण्यावरुन या शहराचा कारभार करु शकतं का? आणि करु शकतील, तर पहिला तुमच्या शहरात करा”, असं म्हणत गणेश नाईकांनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला होता.

“संदीप नाईकचा बळी दिला म्हणतो. पण, मी संदीपला इथून लढ म्हणालो होतो. हे सर्व कार्यकर्त्यांना माहित आहे”, असं म्हणत गणेश नाईकांनी जितेंद्र आव्हाडांचे आरोपही फेटाळले होते.

Ganesh Naik on Sharad Pawar

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us