काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 40 च्या वर जागा येणार नाहीत : गिरीश महाजन

| Updated on: Sep 16, 2019 | 10:10 PM

गेल्या पाच वर्षात या सरकारवर कोणताही डाग नाही, गेल्या सरकारने अंगावर शाईच ओतून घेतली होती, असं म्हणत विकासाच्या जोरावर भाजप पुन्हा सत्तेत येईल, असंही गिरीश महाजन (Girish Mahajan Man Khatav) म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 40 च्या वर जागा येणार नाहीत : गिरीश महाजन
Follow us on

सातारा : या निवडणुकीत युतीची 240 च्या खाली एकही जागा येणार नाही आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 40 च्या वर जागा येणार नाहीत, असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan Man Khatav) यांनी केला आहे. गेल्या पाच वर्षात या सरकारवर कोणताही डाग नाही, गेल्या सरकारने अंगावर शाईच ओतून घेतली होती, असं म्हणत विकासाच्या जोरावर भाजप पुन्हा सत्तेत येईल, असंही गिरीश महाजन (Girish Mahajan Man Khatav) म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे 40 पेक्षा कमी आमदार येतील. आघाडी सरकारसारख्या आम्ही भूलथापा मारत नाही. पाच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. मात्र कोणताही डाग अंगावर पडला नाही, पूर्वीच्या सरकारने अंगावर एवढी शाई टाकून घेतल्याने ते घरी गेल्याचा आरोप जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला.

सातारा जिल्ह्यातील मान खटावमधील दहीवडीत गिरीश महाजन जिहे कठापूर उपसा सिंचन योजना भूमीपूजनावेळी बोलत होते. उत्तर मानमधील 32 गावांना पाणी देण्याच्या कामाचं भूमीपूजन करण्यात आलं. या मतदारसंघाचे माजी आमदार जयकुमार गोरे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.

भाजपात छत्रपती उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी भाजपात प्रवेश केलाय. आघाडीत शब्द देत होते, मात्र ते पाळत नव्हते. त्यामुळे जो पाच वर्षात विकास झाला तो पूर्वी कधीच झाला नाही. त्यामुळे आघाडीत कोणीच राहण्यासाठी तयार नसल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्र्यांनी समुद्रात पावसाचं जाणार पाणी वळवून दुष्काळी भागात देण्याचा निर्णय घेतला. यासाठी तब्बल 50 हजार कोटींपेक्षा खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील पिढीला दुष्काळ पाहायला मिळणार नसल्याचा दावा महाजन यांनी केलाय.