‘काँग्रेस सरकार नाही, पण सरकार काँग्रेसमुळे’, नाना पटोलेंकडून शिवसेनेला आठवण करुन देण्याचा प्रयत्न

| Updated on: Mar 30, 2021 | 5:15 PM

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदावरुन महाराष्ट्रात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे.

काँग्रेस सरकार नाही, पण सरकार काँग्रेसमुळे, नाना पटोलेंकडून शिवसेनेला आठवण करुन देण्याचा प्रयत्न
नाना पटोले आणि संजय राऊत
Follow us on

मुंबई : UPA अर्थात संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदावरुन महाराष्ट्रात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी UPAच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवड करण्याची सूचना काँग्रेसला केलीय. तसंच शरद पवार यांचं नेतृत्व स्वीकारा असा सल्लाही राऊतांनी देऊ केलाय. त्यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना नेतृत्वाला एकप्रकारे इशारच देऊ केलाय.(Government of Maharashtra is due to Congress, Nana Patole reminds ShivSena)

“आमच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याबद्दल ते सातत्याने वक्तव्य करत आहेत. त्यांना सांगितलं की शिवसेना काही UPAचा घटक नाही. पण तरीही ते सातत्याने आमच्या नेत्यांवर टीका करत आहेत. आता त्यांना आम्ही सांगितलं आहे की, आम्ही सरकार नाही पण सरकार आमच्यामुळे आहे”, अशा शब्दात नाना पटोले यांनी एकप्रकारे शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांना इशारा दिला दिला आहे. यापूर्वीही नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी संजय राऊत यांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला होता. शिवसेनेनं आधी UPAचा घटक व्हावं, मग त्यांच्या मतांचा विचार केला जाईल, असा टोलाही तांबे यांनी संजय राऊतांना लगावला होता.

संजय राऊत शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का?

यापूर्वी नाना पटोले यांनी संजय राऊतांना फटकारलं होतं. संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का? असा सवालच पटोलेंनी विचारला होता. त्याचबरोबर काँग्रेसचे नेते याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलले आहेत. मुळात शिवसेना यूपीएचा भागच नाही. मग त्यांना याबाबत चर्चा करण्याचा किंवा मत नोंदवण्याचा अधिकारच नाही, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केलं होतं.

संजय राऊत काय म्हणाले होते?

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) प्रमुखपदी शिवसेनेने शरद पवार यांचे नाव सुचवल्यामुळे काँग्रेस पक्ष नाराज झाल्याचा दावा संजय राऊत यांनी फेटाळून लावला. यूपीए आणखी मजबूत व्हायला पाहिजे, असे काँग्रेसमधील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. सोनिया गांधी यांनी प्रदीर्घकाळ यूपीएचे अध्यक्षपद भुषविले आहे. मात्र, सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसते. देशात वेगळ्याप्रकराच्या घडामोडी घडत आहेत. अशावेळी यूपीएचे नेतृत्त्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावे, असे देशातील अनेक पक्षांची म्हणणं आहे. शरद पवार यांच्याकडे किती खासदार आहेत, हा प्रश्न नाही. मी नेहमीच शरद पवार यांचे समर्थन केले आहे. जे पक्ष यूपीए किंवा एनडीएमध्ये नाहीत अशा पक्षांना एकत्र आणून यूपीएची पुनर्बांधणी झाली पाहिजे. अनेक पक्षांना शरद पवार यांचे नेतृत्त्व मान्य होऊ शकते, असं संजय राऊत म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

संजय राऊत शरद पवारांचे प्रवक्ते आहे का; नाना पटोलेंनी फटकारले

UPA हा दिल्लीतला विषय, जिल्हा-तालुका स्तरावरील नेत्यांनी यामध्ये पडू नये; राऊतांचा नाना पटोलेंवर पलटवार

Government of Maharashtra is due to Congress, Nana Patole reminds ShivSena