Chagan Bhujbal | राज्यपालांचं मुंबईकरांना दुखावणारं वक्तव्य, छगन भुजबळांनी बिर्ला आणि राजस्थानचा इतिहासच सांगितला, काय म्हणाले वाचा…

| Updated on: Jul 30, 2022 | 11:02 AM

अशा विषयामुळे वाद वाढतात. राज्यपाल निर्विवाद असले पाहिजेत. मुंबई ही कोळी आणि आगरी समाजाची आहे. ब्रिटिशांनादेखील मुंबई आवडली होती, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं.

Chagan Bhujbal | राज्यपालांचं मुंबईकरांना दुखावणारं वक्तव्य, छगन भुजबळांनी बिर्ला आणि राजस्थानचा इतिहासच सांगितला, काय म्हणाले वाचा...
छगन भुजबळ, नेते राष्ट्रवादी काँग्रेस
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नाशिकः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मुंबई आणि मराठी माणसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सर्वच राजकीय पक्षांकडून टीका होत आहे. भाजप वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे नेत्यांकडून राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chagan bhujbal) यांनी तर मुंबई आणि महाराष्ट्राचा इतिहास आणि त्याचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. राजस्थान आणि गुजरातप्रमाणेच मुंबईतील मराठी माणसांचे (Marathi Manoos) कष्टही तितकेच महत्त्वाचे आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत इथला मराठी माणूस कसा विकसित आहे, याबद्दल भुजबळांनी वक्तव्य केलं. नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी मत मांडलं.

काय म्हणाले छगन भुजबळ?

नाशिकमध्ये बोलताना छगन भुजबळ म्हणाले, ‘ गुजरात आणि राजस्थानमध्ये मुळात व्यापारी समाज आहे. राजस्थानमध्येही काही भागात वाळवंटच आहे. ते लोक बाहेर पडलेले आहेत. बिर्लांचा इतिहास पाहिला, तर ते राजस्थानमधून कलकत्याला गेले. मुंबईतही ही सगळी मंडळी आली आणि हे महत्त्व वाढलं. पण मुंबईच्या मराठी माणसांचे कष्ट विसरता येत नाही. मुंबईत नाशिकमधून पाणी, पुण्यातून भाजीपाला, वीज राज्यभरातून जाते. त्यामुळे ती नसेल तर काय होईल, असा प्रश्न विचारता येईल. अहमदाबादमध्ये ज्या वेळेला 60-70 कापड गिरण्या होत्या वेळेला मुंबईतही 64 गिरण्या होत्या. मुंबईचं हवामान हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. तिन्ही बाजूंनी समुद्र असल्यामुळे थंड आणि गरम असं तीव्र वातावरण नसतं. दिल्लीसारखं हवेचं प्रदुषण नसतं. एका बाजूनी हवा आली की दुसऱ्या बाजूने निघून जाते. मुंबईची बंदरं, विमानतळं, बॉलिवूडचं महत्त्वही खूप आहे. यात फक्त गुजरात आणि राजस्थानचे लोक नाहीत. त्यामुळे राज्यपालांनी केलेलं वक्तव्य तर्कहीन असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली.

भुजबळांचा राज्यपालांना काय इशारा?

छगन भुजबळ पुढे म्हणाले, ‘अशा विषयामुळे वाद वाढतात. राज्यपाल निर्विवाद असले पाहिजेत. मुंबई ही कोळी आणि आगरी समाजाची आहे. ब्रिटिशांनादेखील मुंबई आवडली होती. देशातील अनेक लोकांनी मुंबईत येऊन मुंबईच्या भरभराटीला हात लावले. असं असलं तरी मुंबई हे महाराष्ट्राची आहे हे कोणी नाकारू शकत नाही. मुंबईत असलेली भौगोलिक परिस्थिती,संस्कुती आणि भाषा ही सगळी मराठी माणसाची आहे. कोरोना मध्ये गेलेले अनेक नागरिक मुंबईत परत आले. तिकडच्या मुख्यमंत्र्यांनी जाण्याची गरज नाही असे सांगितले तरी सगळे परत आले.

नाना पटोलेंचं वक्तव्य काय?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील राज्यपालांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. चंद्रपूरमध्ये त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ राज्यपालांचे वक्तव्य बेताल आहे. महाराष्ट्राने गुजराती आणि राजस्थानी लोकांना पोसले आणि मोठे केले. अदानी-अंबानी या राज्यात मोठे झाले. आज हे वक्तव्य करून राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अवमान केला आहे. यासाठी त्यांनी तमाम मराठी बांधवांची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली असून, भाजपने यांना परत बोलवावे, असेही नाना म्हणाले.