कोरोना संकट गेल्यावर मैदानात या आणि सरकार पाडून दाखवा, गुलाबराव पाटलांचं भाजपला आव्हान

| Updated on: May 27, 2020 | 9:33 PM

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे स्थिर असून ते आपला कार्यकाळ यशस्वीपणे पार पाडेल, असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला (Gulabrao Patil Challenge to BJP).

कोरोना संकट गेल्यावर मैदानात या आणि सरकार पाडून दाखवा, गुलाबराव पाटलांचं भाजपला आव्हान
Follow us on

जळगाव :राज्य सरकार कोरोनासारख्या महामारीशी लढा देत असताना (Gulabrao Patil Challenge to BJP) विरोधक घाणेरडं राजकारण करत आहेत. विरोधकांकडून सरकार पडणार असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. पण हे सरकार स्थिर आहे. कोरोनाचं संकट गेल्यावर मैदानात या, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा”, असं आव्हान राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना दिलं आहे (Gulabrao Patil Challenge to BJP) .

गुलाबराव पाटील आज (27 मे) दुपारी जळगावातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात आले होते. यावेळी राज्यातील राजकीय परिस्थितीविषयी ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे स्थिर असून ते आपला कार्यकाळ यशस्वीपणे पार पाडेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

“विरोधकांकडून महाविकास आघाडीचे सरकार पाडणार असल्याची चर्चा रंगवली जात आहे. कोरोनासारख्या कठीण काळात अशी चर्चा रंगवणे म्हणजे, विरोधक जबाबदारीने आपले काम करणारे मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत”, असा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला.

“कोरोनाच्या काळात कोण काय करत आहे? हे जनता जाणून आहे. कोरोनाचं संकट येण्यापूर्वी मध्यप्रदेशात ज्या पद्धतीने वातावरण निर्माण केलं गेलं, त्याचपद्धतीने महाराष्ट्रात वातावरण निर्मिती सुरु आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाला जनतेने स्वीकारलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनतेच्या मनात पक्के बसलेले आहेत. त्यामुळे सरकार पाडण्याचा विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न आहे. कोरोनासारख्या संकटात विरोधकांनी हा घाण प्रयत्न केला आहे”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

“कोरोनाशी लढा देण्यासाठी राज्य सरकार शक्य ते प्रयत्न करत आहे. त्यामुळे विरोधकांकडून सरकारवर होणारा अकार्यक्षमतेचा आरोप चुकीचा आहे. त्यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांना सल्ला देण्यापेक्षा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा. एखादा मासा पाण्यातून बाहेर काढल्यानंतर ज्या पद्धतीने तरफडतो, त्याच पद्धतीने विरोधक सत्ता गेल्यामुळे तरफडत आहेत”, असा घणाघात गुलाबराव पाटील यांनी केला.

संबंधित बातम्या :

आमची मानसिकता ढळू देणार नाही, महाराष्ट्र कोरोनामुक्त करणार, फडणवीसांच्या प्रश्नांना उत्तर देऊ : बाळासाहेब थोरात

देवेंद्र फडणवीसांच्या प्रत्येक दाव्याला अनिल परब यांचं प्रत्युत्तर

चिडलेल्या रेल्वेमंत्र्यांनी एकदम 152 ट्रेन उलट-सुटल सोडल्या, सरकारच्या बदनामीचा प्रयत्न : अनिल परब

सरकारच्या फेकाफेकीचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल : देवेंद्र फडणवीस