‘भाजपमध्ये आल्यापासून शांत झोप लागते, चौकशीही नाही’, हर्षवर्धन पाटलांच्या वक्तव्यानं खळबळ; आता विरोधकांना रान मोकळं!

| Updated on: Oct 13, 2021 | 5:30 PM

हर्षवर्धन पाटील यांनी मावळमध्ये एका खासगी कार्यक्रमात बोलताना गमतीगमतीत एक वक्तव्य केलं. भाजपमध्ये आल्यापासून शांतपणे झोप लागते. कसली चौकशी नाही, असं पाटील म्हणाले. पाटील यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय.

भाजपमध्ये आल्यापासून शांत झोप लागते, चौकशीही नाही, हर्षवर्धन पाटलांच्या वक्तव्यानं खळबळ; आता विरोधकांना रान मोकळं!
हर्षवर्धन पाटील, भाजप नेते
Follow us on

पुणे : भाजपमध्ये गेल्यावर ‘वाल्याचा वाल्मिकी होतो’ अशी टीका महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सातत्याने केली जाते. तशी काही उदाहरणंही हे नेते देत असतात. आता माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या एका वक्तव्यानं विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं आहे. हर्षवर्धन पाटील यांनी मावळमध्ये एका खासगी कार्यक्रमात बोलताना गमतीगमतीत एक वक्तव्य केलं. भाजपमध्ये आल्यापासून शांतपणे झोप लागते. कसली चौकशी नाही, असं पाटील म्हणाले. पाटील यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. (Harshvardhan Patil’s statement about BJP entry and inquiry in Maval)

हर्षवर्धन पाटील हे आपलं खुमासदार भाषण आणि मिश्किल वक्तव्यांमुळं चांगलेच चर्चेत असतात. मावळमध्ये बोलताना काँग्रेस सोडून भाजपमध्ये का आलो, याचं उत्तर त्यांनी दिलं. ‘स्टेज गमतीशीर आहे. आम्हाला भाजपमध्ये जावं लागलं. स्टेजवर एकानं बसल्या बसल्या विचारलं भाजपमध्ये का गेलात? तेव्हा मी त्याला म्हटलं, हे मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा की हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये का गेला? बाकी सध्या सगळं मस्त आहे, निवांत आहे, चांगली झोप लागते, चौकशी वगैरे नाही’, असं वक्तव्य पाटील यांनी केलं. पाटलांच्या या वक्तव्यानं स्टेजवर उपस्थित सर्वांच खळखळून हसले.

मावळमधील या कार्यक्रमाला भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

संजय राऊतांचा भाजपला टोला

दरम्यान, पाटील यांच्या या वक्तव्याचा धागा पकडत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. हर्षवर्धन पाटील यांच्या या एका वक्तव्यामध्ये सर्व काही सामावलेलं आहे, असं संजय राऊत म्हणाले. राज्यात सध्या अनिल देशमुख, अनिल परब, भावना गवळी, अजित पवार यांच्या नेत्यांवर ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या धाडी पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर पाटलांच्या वक्तव्याचा धागा पकडत राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय.

आता पाटील म्हणतात विपर्यास केला!

दरम्यान, पाटील यांनी आता आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन वेगळे अर्थ काढले जात आहेत. मी भाषणात कुणाचाही उल्लेख केला नाही. कुणाचा उल्लेख करणं गरजेचं असल्याचं मला वाटत नाही. त्यामुळे वाक्याचा अनर्थ कुणी काढू नये. मला विधानसभेला तिकीट नाकारण्यात आलं म्हणून मी भाजपमध्ये गेलो. हा माझा राजकीय निर्णय आहे. माझ्या कुठल्याही चौकशीचा व माझ्या भाजप प्रवेशाचा काही एक संबंध नाही. विधानसभेला मला तिकीट देण्याचा शब्द दिला होता. मात्र, तो पाळला गेला नाही. त्यामुळेच मी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

इतर बातम्या :

‘आयकर विभाग 7 दिवस टोटल मारत आहे तरी हिशेब लागत नाही’, किरीट सोमय्यांच्या दाव्यानं मोठी खळबळ!

Maharashtra College Reopening : राज्यातील कॉलेज 20 ऑक्टोबरपासून सुरु, विद्यार्थ्यांना दोन्ही डोस आवश्यक

Harshvardhan Patil’s statement about BJP entry and inquiry in Maval