Pradnya Satav : प्रज्ञा सातव यांचा मोठा गौप्यस्फोट, हा सलग दुसरा हल्ला,आधी कुठे झाला होता प्रयत्न?

| Updated on: Feb 09, 2023 | 2:03 PM

आमच्या दौऱ्यांमधून पक्षाची ताकद वाढताना दिसतेय. हे दौरे थांबवले पाहिजेत. महिला आहे, घाबरवून घरी बसवलं पाहिजे, असा अजेंडा असू शकतो, अशी शक्यता सातव यांनी बोलून दाखवली.

Pradnya Satav : प्रज्ञा सातव यांचा मोठा गौप्यस्फोट, हा सलग दुसरा हल्ला,आधी कुठे झाला होता प्रयत्न?
Image Credit source: social media
Follow us on

हिंगोलीः दिवंगत आमदार राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला आहे. कालच प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ल्याचा (Attack) प्रयत्न करण्यात आला. माझ्या जीवाला धोका आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आज tv9शी बोलताना प्रज्ञा सातव यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्यावर झालेला हा सलग दुसरा हल्ला असल्याचं त्यांनी सांगितलं. यापूर्वीही नोव्हेंबर महिन्यात भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेदरम्यान, अशा प्रकारचा हल्ला झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मात्र त्यावेळी आम्ही फार सिरियसली घेतलं नाही. पण सलग दुसरी घटना घडल्यानंतर आम्ही पोलिसात तक्रार द्यायचा निर्णय घेतल्याचं सातव यांनी सांगितलं.

याआधी काय घडलं होतं?

प्रज्ञा सातव यांनी टीव्ही 9 शी बोलताना सांगितलं, ‘नोव्हेंबर महिन्यात भारत जोडो यात्रेत तयारी करत होतो, तेव्हा पेडगाव या गावातही भर दुपारी ४ वाजता हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. पण तेव्हा आम्ही सिरियसली घेतलं नाही. पण काल कसबा धावंडा या गावीदेखील तसाच प्रकार झाला. त्यामुळे आपण शांत बसलं नाही पाहिजे, असं वाटलं म्हणून मी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

काल कुठे झाला हल्ला?

प्रज्ञा सातव या काल कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथे दौऱ्यावर होत्या. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने मागून येऊन हल्ला केला, अशी माहिती प्रज्ञा सातव यांनी ट्विटरद्वारे दिली. आज माझे पती राजीव भाऊ नाहीत. मुले लहान आहेत. मी कुणाचंही वाईट केलेलं नाही. माझ्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

षडयंत्र आहे का?

काल आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. हे विरोधकांचं षडयंत्र असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तुमचाही असाच आरोप आहे का, या प्रश्नाचं उत्तर देताना प्रज्ञा सातव म्हणाल्या, ‘ आम्ही आमच्या पक्षाचं काम ताकतीने करत असतो. रोज ३-४ गावांत फिरतो. जनतेचे प्रश्न सोडवायचे प्रयत्न करत असतो. आमच्या दौऱ्यांमधून पक्षाची ताकद वाढताना दिसतेय. हे दौरे थांबवले पाहिजेत. महिला आहे, घाबरवून घरी बसवलं पाहिजे, असा अजेंडा असू शकतो. हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं माझं वैमनस्य नव्हतं.मी त्याला ओळखतही नव्हते, तरीही यामागचं नेमकं कारण काय आहे, ते समोर आलेलं नाही, असं वक्तव्य प्रज्ञा सातव यांनी केलंय.

पोलिस तपास योग्य?

आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा औरंगाबादच्या वैजापूर येथे असताना गोंधळ माजला होता. या ठिकाणी दगडफेक झाल्याच आरोप शिवसेनेने केला. मात्र औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला. इथे दगडफेक झालीच नव्हती, असा खुलासा पोलिसांनी केलाय. तर दुसऱ्याच दिवशी हिंगोलीत प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. पोलीस योग्य सहकार्य करत नसल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. प्रज्ञा सातव यांनी मात्र पोलिसांचा तपास नेमका कसा सुरु आहे, हे आताच सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.