राज्यात ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा; शाळेला सुट्टी, पुढील काही तास अत्यंत धोक्याचे, आयएमडीच्या नव्या इशाऱ्याने झोप उडाली
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे पुढील काही तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही भागांना भारतीय हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात सध्या धो-धो पाऊस कोसळत आहे, दरम्यान पुढील काही तासांमध्ये आता महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. पुढील चार दिवस राज्यात पावसाची स्थिती अशीच राहणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही भागांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर आता काही ठिकाणी शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे. पुढील चार दिवस कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
काय आहे हवामान विभागाचा नवा अंदाज?
‘रेड अलर्ट हा कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यासाठी देण्यात आलेला आहे. उर्वरीत महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पडू शकतो. विदर्भात देखील काही भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार दिवस राज्यात पावसाची स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे.
जून मध्ये राज्यात सरासरीच्या फक्त 53 टक्के इतकाच पाऊस झाला आहे. आणि संपूर्ण देशाचा विचार केला तर फक्त सरासरीच्या 40 टक्के इतकाच पाऊस झाला आहे. एकंदरीत विचार केला तर राज्यात जूनमध्ये 40 ते 50 टक्के पावसाची तूट झाली आहे, परंतु येणाऱ्या चार दिवसांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे, ज्यावेळी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, त्यावेळी मान्सूनचे वारे स्ट्रॉग होतात हीच स्थिती राज्यात सध्या निर्माण झाली आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
शाळेला सुट्टी
दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर कल्याण -डोंबिवलीतील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेसाठी शिक्षण विभागाने सुट्टीचा निर्णय घेतला आहे. रेड अलर्टच्या इशाऱ्या नंतर केडीएमसी अलर्ट मोडवर असल्याचं पहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर १२ नियंत्रण कक्ष सज्ज झाले आहेत. पूरस्थिती उद्भवल्यास नागरिकांच्या निवाऱ्यासाठी पालिकेच्या शाळा सज्ज करण्यात आल्या आहेत, गरज लागली तर खासगी शाळा देखील ताब्यात घेतल्या जाणार आहेत. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. दरम्यान दुसरीकडे पालघर जिल्ह्याला देखील पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
