तेव्हाच मनात पाल चुकचुकली…रश्मी शुक्ला-फडणवीस भेटीवर एकनाथ खडसे काय म्हणाले?

| Updated on: Oct 21, 2022 | 8:57 AM

फडणवीस आणि शुक्लांची भेट झाल्यानंतर त्यांना क्लीन चिट मिळणार, असं वाटलं होतं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांनी दिली.

तेव्हाच मनात पाल चुकचुकली...रश्मी शुक्ला-फडणवीस भेटीवर एकनाथ खडसे काय म्हणाले?
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट झाली, तेव्हाच माझ्या मनाल शंकेची पाल चुकचुकली अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिली. फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने रश्मी शुक्ला यांचा खटला चालवण्यासाठीची परवानगी नाकारली आहे.

बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचे गंभीर आरोप पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर झाले होते. तत्कालीन पोलीस महासंचालक संजय रांडे यांची समितीदेखील स्थापन करण्यात आली होती. या समितीने अहवाल सादर केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काय आहे प्रकरण?

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील हे प्रकरण आहे. रश्मी शुक्ला त्यावेळी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आय़ुक्त होत्या. तत्कालीन पोलीस महासंचालकांना शुक्ला यांनी पाठवलेला गोपनीय अहवाल मार्च 2021 मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. देवेंद्र फडणवीस यांनी हा या अहवालातील डिटेल्स उघड केले होते.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून पोलिसांच्या नियुक्त्या आणि बदल्यांमध्ये भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

याविरोधात महाविकास आघाडी सरकारने रश्मी शुक्ला यांच्यावर अवैधरित्या फोन टॅपिंग केल्याचा आरोप करत चौकशी नेमली होती. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हादेखील दाखल झाला होता.

मात्र नुकताच राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणी कायदा विभाग व पोलिसांचे मत जाणून घेण्यात आले. रश्मी शुक्ला यांच्याविरोधात ज्या कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे, ती कलमं यात लावता येणार नाहीत, असं मत व्यक्त केलं गेलं. या संदर्भात झेरॉक्स पेपरव्यतिरिक्त कोणताही पुरावा उपलब्ध नाही, असे पोलिसांनी सांगितलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा खटला चालवण्यास नकार दिला आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

दरम्यान, फडणवीस आणि शुक्लांची भेट झाल्यानंतर त्यांना क्लीन चिट मिळणार, असं वाटलं होतं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांनी दिली.