मोदी सरकार जाईपर्यंत शर्ट घालणार नाही, पवारांसमोर तरुणाचा निर्धार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

नाशिक : कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळतोय. त्याला वाचा फोडण्यासाठी तीन वर्षांपूर्वी पाच एकरात असलेले कांदे जाळून शासनाचा निषेध केला. मात्र कुठलीही दखल न घेतल्याने लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंगात असलेला शर्ट, बनियन आणि पायातील चप्पलही मोदींना पाठवली. मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे लोकसभा आणि विधानसभेपर्यंत अर्धनग्न अवस्थेत राहून या शासनाच्या विरोधात लढा सुरु ठेवणार आहे, अशी […]

मोदी सरकार जाईपर्यंत शर्ट घालणार नाही, पवारांसमोर तरुणाचा निर्धार
(संग्रहित फोटो)
Follow us on

नाशिक : कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळतोय. त्याला वाचा फोडण्यासाठी तीन वर्षांपूर्वी पाच एकरात असलेले कांदे जाळून शासनाचा निषेध केला. मात्र कुठलीही दखल न घेतल्याने लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंगात असलेला शर्ट, बनियन आणि पायातील चप्पलही मोदींना पाठवली. मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे लोकसभा आणि विधानसभेपर्यंत अर्धनग्न अवस्थेत राहून या शासनाच्या विरोधात लढा सुरु ठेवणार आहे, अशी घोषणा नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील नगरसुल येथील तरुण शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर केली. याबाबतचं निवेदनही त्यांनी पवारांना दिलं.

शेतमालाला बाजारभाव नाही, शेतकऱ्यांचं आंदोलन दडपलं जातंय, असं म्हणत तरुण शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी अर्धनग्न आंदोलन केलं आणि याबाबतचं निवेदन पवारांना दिलं. पवारांनीही मोदींवर सडकून टीका केली. मी अजून म्हातारा झालो नाही, मोदी सरकारला खाली बसवल्याशिवाय मी थांबणार नाही, असं पवार म्हणाले.

देशाची अर्थव्यवस्था शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. दुर्दैवाने मोदी सरकारने गेल्या 5 वर्षात शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही. मी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांच्या पिकांची भाववाढ झाल्यावर मला संसदेत सवाल केले जायचे, तेव्हाही मी सांगायचो की मला खाणाऱ्यापेक्षा पिकवणारे महत्वाचे वाटतात. पिकवणाऱ्यांनी जर पिकवले नाही, तर खाणारे काय खातील? म्हणून मी पहिल्यांदा पिकवणाऱ्यांचा विचार करणार आणि शेतकरी विरोधी असलेल्या मोदी सरकारला खाली बसवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा निर्धार शरद पवार यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजप-शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेच्या व्यासपीठासमोर शेतकऱ्यांच्या भीतीपोटी खंदक खंदून ठेवल्याने शरद पवार यांनी आश्चर्य व्यक्त केलं. तसेच पिंपळगाव येथे पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी कांदा मार्केट बंद ठेवण्याचा आदेश शासनाने काढला. शेतकऱ्यांचे या दिवशी झालेले नुकसान कोण भरून देणार अशी विचारणा शरद पवार यांनी निफाड येथील सभेतून केली.