काश्मीर प्रश्नी इम्रान खान यांचं धोरण यशस्वी : प्रकाश आंबेडकर

| Updated on: Aug 05, 2019 | 7:19 PM

जम्मू काश्मीर मुद्यावर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याचं म्हटलं होतं आणि या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तान द्यायला निघाला. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची डिप्लोमसी यशस्वी झाल्याचंही आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी म्हटलंय.

काश्मीर प्रश्नी इम्रान खान यांचं धोरण यशस्वी : प्रकाश आंबेडकर
Follow us on

पुणे : जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द झालं असं मी म्हणणार नाही. यातील दोन आणि तीन क्रमांकाच्या तरतुदी रद्द करण्याचा ठराव मांडण्यात आलाय. मात्र यामुळे जम्मू-काश्मीरच्या राजांबरोबर झालेल्या कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप भारिपचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलाय. जम्मू काश्मीर मुद्यावर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याचं म्हटलं होतं आणि या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तान द्यायला निघाला. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची डिप्लोमसी यशस्वी झाल्याचंही आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी म्हटलंय.

वाचा – पाकिस्तानला जाणारं पाणी थांबवण्याचा निर्णय टिकणार नाही : प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारने ऐतिहासिक पाऊल टाकत जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र देशातील ढासळलेल्या अर्थव्यवस्थेकडून लक्ष हटवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. त्याचबरोबर या माध्यमातून एक ज्वालामुखी तयार केल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला. मुद्दा आता जागतिक पातळीवर जाईल आणि या निर्णयावर राज्यातील निवडणुका भाजपा जिंकेल, असंही त्यांनी म्हटलंय.

काळाच्या ओघात कलम 370 आपोआप संपलं असतं. भाजप हा सेक्युलर नाही, तर हिंदूंचा पक्ष असल्याचं म्हटल जातंय, त्यात हे असं करणं अयोग्य असल्याचं मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं. आक्रमक हिंदूंनी हे लक्षात घ्यावं की त्यांना देशाची एकता कायम ठेवायचा आहे का, असा सवाल त्यांनी केलाय.

बीड : पुलवामा हल्ला मुद्दाम घडवून आणला का? : प्रकाश आंबेडकर

येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान हाच मुद्दा भाजपकडून उपस्थित केला जाईल. इतर देश तोडत होते आणि आम्ही देश जोडत होतो, असा प्रचार केला जाईल.  यामुळे राज्यातील ज्या काही समस्या आहेत, त्याऐवजी काश्मीर कसा जोडला यावरच चर्चा होईल. याच मुद्द्यावर तिथे निवडणुका जिंकतील, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.