‘ये तो सिर्फ गुर्राना था, अभी दहाड बाकी है’, खासदार इम्तियाज जलील यांचा मुंबईतून ठाकरे सरकारला इशारा

| Updated on: Dec 11, 2021 | 9:40 PM

कुठे आहे 93 हजार एक जमीन? कुणी कुणाला वाटली, कुणी कुणाला विकली? 8 महिने झाले मला महाराष्ट्र वक्फ बोर्डाचा सदस्य होऊन. या काळात 9 एफआयआर दाखल केले आहेत. जे विचार करत होते की आम्हाला कोण रोखू शकतं. आम्ही सर्वांना विकत घेऊ शकतो. त्यांना काय माहिती बाजारात कुत्र्यांची पिल्लं विकली जातात, आम्ही नाही. बाजारात सिंह विकले जात नाहीत, त्यातील एक स्टेजवर आहे, असं सांगत जलील यांनी विरोधकांना थेट इशारा दिलाय.

ये तो सिर्फ गुर्राना था, अभी दहाड बाकी है, खासदार इम्तियाज जलील यांचा मुंबईतून ठाकरे सरकारला इशारा
इम्तियाज जलील, खासदार एमआयएम
Follow us on

मुंबई : मुस्लिम आरक्षण (Muslim Reservation) आणि वक्फ बोर्डाची 93 हजार जमीन परत देण्याच्या मागणीसाठी आज खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्या नेतृत्वात राज्यभरातून तिरंगा रॅली मुंबईत धडकली. चांदिवलीतील मैदानात झालेल्या सभेत बोलताना खासदार इम्तियाज जलील यांनी ‘हमारी आवाज पर छा गयी इतनी बौखलाहट, ये तो सिर्फ गुर्राना था… अभी दहाड बाकी है’, अशा शब्दात ठाकरे सरकारला (Thackeray Government) इशारा दिलाय. तसंच विधानसभेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान विधानसभेबाहेर धरणं आंदोलनाची घोषणाही जलिल यांनी केलीय.

‘त्यांना वाटलं होतं सरकार आमचं आहे, आम्ही काहीही करु शकतो. मी समजत होतो जनता माझी आहे मी काहीही करु शकतो. त्यांनी पूर्ण ताकद लावली, की मी इथं पोहोचू नये. मी ही पूर्ण ताकद लावली. त्यामुळेच म्हणतोय, मुंबई… लो मै आ गया. मला माहिती आहे की, ज्या प्रकारे अडवण्यात आलं त्यात पोलिसांचा हात नव्हता. ते आपलं काम करत होते. पण ते कोण लोक होते ज्यांना आम्ही मुंबईत यायला नको होतं. ही रॅली आयोजित केली तेव्हा आम्ही स्पष्ट केलं होतं की ही एका पक्षाची रॅली नसेल. आम्ही राष्ट्रवादी, काँग्रेस आता शिवसेनाही मुस्लिमांबाबत बोलतेय, त्यांच्या मुस्लिम नेत्यांनाही बोललो होतो. मराठा आंदोलनातून एक गोष्ट शिकायला हवी. मराठा बांधव कुठला पक्ष म्हणून रस्त्यावर उतरला नाही. आम्हीही सर्व पक्षातील मुस्लिम नेत्यांना दाखला देत विनवणी केली. पण त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही’, अशी खंत जलिल यांनी व्यक्त केलीय.

‘फक्त निवडणुकीपुरताच मुस्लिमांचा विचार होतो’

अनेकजण मला म्हणाले, आरक्षणाचा जुना विषय आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनी कुठे उरल्या आहेत? पण मंजिल मिले ना मिले, ये मुक्कदर की बात है; हम कोशिश भी ना करे, ये गलत बात है. आम्ही प्रयत्न करु, पूर्ण ताकदीने प्रयत्न करु. प्रयत्नाचं फळ काय असतं हे आज आम्हाला समोर पाहायला मिळत आहे. आजवर मुस्लिमांचा वापर कसा केला जातो. मुस्लिमांना एखाद्या खेळण्याच्या वस्तूप्रमाणे कसं वापरलं जातं हे दाखवून देणार आहोत. निवडणुकीपुरताच मुस्लिमांचा विचार केला जातो, अशी टीका जलिल यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केलीय.

‘बाजारात कुत्र्यांची पिल्लं विकली जातात, आम्ही नाही’

कुठे आहे 93 हजार एक जमीन? कुणी कुणाला वाटली, कुणी कुणाला विकली? 8 महिने झाले मला महाराष्ट्र वक्फ बोर्डाचा सदस्य होऊन. या काळात 9 एफआयआर दाखल केले आहेत. जे विचार करत होते की आम्हाला कोण रोखू शकतं. आम्ही सर्वांना विकत घेऊ शकतो. त्यांना काय माहिती बाजारात कुत्र्यांची पिल्लं विकली जातात, आम्ही नाही. बाजारात सिंह विकले जात नाहीत, त्यातील एक स्टेजवर आहे, असं सांगत जलील यांनी विरोधकांना थेट इशारा दिलाय.

अधिवेशन काळात धरणं आंदोलनाचा इशारा

तसंच उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, काँग्रेसच्या नेत्यांनो, तुम्ही आमची 93 हजार एकर जमीन आम्हाला परत दिली तर तुम्ही मुस्लिमांसाठी जे काही बजेट देता ते देऊ नका. आम्हीच तुम्हाला तीनशे-चारशे कोटी बक्षीस म्हणून देऊ, असं सांगत विधानसभेचं अधिवेशन येत आहे. जेव्हा ते आत असतील तेव्हा बाहेर एक धरणं देऊ, असा थेट इशारा जलिल यांनी दिला आहे.

औरंगाबादहून एक खासदार येऊ शकतो तर मुंबईतून चार का नाही?

मला या गोष्टीचा आनंद आहे की ज्या व्यक्तीला पूर्ण जग पाहतोय. संपूर्ण देशात कोण एक व्यक्ती आपल्या हक्काचा आवाज उंचावतोय. त्याच्या बाजूला जाऊन बसण्याचं भाग्य मला आज तुमच्या कृपेमुळं लाभलं. मी ओवेसी साहेबांना म्हणतो की मला मुंबईची जबाबदारी द्या. आमचे फैय्याज भाई, वारिस पठाण साहेब चांगलं काम करत आहेत. पण औरंगाबादहून एक खासदार येऊ शकतो तर मुंबईतील चार का येऊ शकत नाहीत. फक्त आपल्याला एकत्र येऊन काम करावं लागेल, असं सांगत जलिल यांनी मुंबईत नेतृत्व करण्याचे संकेत दिले आहेत.

सत्ताधारी महाविकास आघाडीला सवाल

उच्च न्यायालयाचा निर्णय येऊनही हे सरकार आम्हाला आरक्षण का देत नाहीत? 2014 ते 2019 पर्यंत मी विधानसभेत होतो तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी आदी पक्षांचे नेते मुस्लिम आरक्षणासाठी भाषणं देत होते, प्रश्न विचार होते. पण 2019 नंतर सत्ताबदल झाला. आता तेच सत्तेत आले आहेत. विरोधात होते तेव्हा भाजपला मागत होते, त्यांना मुस्लिमांशी काही देणंघेणं नव्हतं. पण आता सत्तेत तुम्ही आहात, तुम्हाला तिथे पोहोचवण्यात आम्हा मुस्लिमांचाही हात आहे. पण सत्तेत आल्यानंतर विचार बदलला. आम्ही वाट पाहिली, पण नाही. आता आम्ही घोषणा केली की तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आम्ही येतोय. तेव्हा त्यांनी पोलिसांना पुढे केलं. सरकार हमसे डरती है, इसलिए पुलिस को आगे करती है… आम्ही येऊ नये म्हणून कोण खेळ खेळत होतं हे माहिती आहे, अशी टीकाही जलिल यांनी केलीय.

‘देशाला विकास करायचा असेल तर मुस्लिमांना मागे ठेवून चालणार नाही’

मला अडवलं जात होतं. तेव्हा ते पाहत होते की माझ्या मागे तमाम लोक होते. तेव्हा ते ती ताकद पाहून आम्हाला सोडत होते. वाशी टोलनाक्यावर तर हद्द झाली. आम्ही पक्षाचा झेंडा नाही तर देशाचा तिरंगा आमचा अभिमान असलेला तिरंगा घेऊन आलो होतो. तिथे काही पोलिसांनी आम्हाला तिरंगा झेंडा उतरवण्यास सांगितलं. तेव्हा मी त्याला सांगितलं की गाडी तू ठेव, मी तिरंगा घेऊन चालत जाईल. जेव्हा आम्ही निघालो तेव्हा त्यांना वाटलं काहीतरी चुकलं. तेव्हा त्यांनी आम्हाला मुंबईला सोडलं. पण ही अडवणूक का? असा सवाल त्यांनी केलाय. तसंच या देशाला विकास करायचा असेल तर मुस्लिमांना मागे ठेवून आम्ही विकास करु शकत नाही. ही सरकारची जबाबदारी आहे, असंही जलील म्हणाले.

इतर बातम्या :

राज्यात मविआ सरकारनं अराजक माजवलं, ‘सामना’तील टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर

‘लोकसभेत राणेंना इंग्रजीत प्रश्न विचारला गेला, मी ही विचारला असता पण ते आपलेच गाववाले’, विनायक राऊतांचा टोला