Sharad Pawar : सोनिया गांधी, ममता बॅनर्जींची जागा शरद पवारांनी घेतली?; पाच कारणे ज्यामुळे पवार करताहेत विरोधकांचे नेतृत्व!

| Updated on: Jul 17, 2022 | 6:14 PM

Sharad Pawar : देशात जेव्हा जेव्हा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली तेव्हा तेव्हा काँग्रेस या निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहिली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पुढाकारातूनच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार निवडले गेले आहेत.

Sharad Pawar : सोनिया गांधी, ममता बॅनर्जींची जागा शरद पवारांनी घेतली?; पाच कारणे ज्यामुळे पवार करताहेत विरोधकांचे नेतृत्व!
सोनिय गांधी, ममता बॅनर्जींची जागा शरद पवारांनी घेतली?; पाच कारणे ज्यामुळे पवार करताहेत विरोधकांचे नेतृत्व!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (Vice President) यूपीएने आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. तब्बल 19 विरोधी पक्षांनी मिळून दोन्ही निवडणुकीत संयुक्त उमेदवार दिला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यूपीएकडून यशवंत सिन्हा निवडणूक लढवत आहेत. तर उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यूपीएने मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांना उमेदवारी दिली आहे. हे दोन्ही उमेदवार ठरवताना काँग्रेसचे नेते उपस्थित होते. मात्र, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित नव्हत्या. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधीही नव्हत्या. तर, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पुढाकार घेणाऱ्या टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी या सुद्धा उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार ठरवताना विरोधकांच्या बैठकीला नव्हत्या. या दोन्ही बैठकीच्या केंद्रस्थानी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारच (Sharad Pawar) होते. आजही पवारांनीच मीडियाला सामोरे जात उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा केली. त्यामुळे पवार सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांची जागा घेत आहेत का? असा सवाल केला जात आहे. पवारांकडे विरोधकांचे नेतृत्व सरकत असल्याचीही चर्चा सुरू आहे.

काँग्रेस पहिल्यांदाच केंद्रस्थानी नाही

देशात जेव्हा जेव्हा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली तेव्हा तेव्हा काँग्रेस या निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहिली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पुढाकारातूनच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार निवडले गेले आहेत. सोनिया गांधी यांनी बैठक बोलवायचे आणि विरोधकांनी बैठकीला हजर राहायचे असं चित्रं आजवर राहिलं आहे. विशेष म्हणजे काँग्रेसकडून काँग्रेसच्याच नेत्यांची या दोन्ही पदासाठी नावे जाहीर केली जायची. मात्र, या निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेस केंद्र स्थानी राहिली नाही. टीएमसी आणि राष्ट्रवादीने या निवडणुकीत पुढाकार घेतल्याचं पहिल्यांदाच पाहायला मिळालं. त्याचं कारण म्हणजे काँग्रेसची संसदेतील कमी संख्या आणि प्रत्येक राज्यातील निवडणुकीत येणारं अपयश यामुळे काँग्रेसचं मनोबल खचलं आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या नेतृत्वाने यावेळी पुढाकार घेतला नसल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

ममतांचा पुढाकार, पण नेतृत्व पवारांचंच

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेऊन बैठक बोलावली होती. त्यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्रं बोलावलं होतं. त्यामुळे विरोधकांचं नेतृत्व ममता बॅनर्जींकडे जातं की काय अशी शक्यता वर्तवली जात होती. पण ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला तरी नेतृत्व मात्र पवारांकडेच होतं हे अधोरेखित झालं. पवारांनी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार व्हावेत म्हणून ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला होता. परंतु पवारांनी त्यास नकार दिला होता. पवारांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनानंतरच यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आल्याचं सांगण्यात येतं.

सोनिया गांधी आजारी

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सक्रिय न होण्यामागचं कारण म्हणजे त्यांचं आजारपण. आजारी असल्यामुळे सोनिया गांधी यांनी या निवडणुकीत पुढाकार घेतला नसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही पुढाकार न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सोनिया गांधी यांनी या निवडणुकीची जबाबदारी मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपवली. त्यामुळे आपोआपच या निवडणुकीच्या केंद्रस्थानी यूपीएतील इतर घटक पक्ष आले. या सर्वांमध्ये शरद पवार हे सर्वात अनुभवी आणि ज्येष्ठ नेते असल्याने त्यांच्याकडेच या विरोधी पक्षांचं नेतृत्व गेलं.

ज्येष्ठ आणि सर्वात अनुभवी नेते

देशातील काही मोजक्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांपैकी शरद पवार हे एक आहेत. शिवाय सर्वच पक्षांमध्ये त्यांच्या शब्दाला किंमत आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुकीतील धुरा पवारांकडे आली आहे. पवारांकडे आमदार आणि खासदारांची संख्या अधिक नसली तरी त्यांचं नैतिक वजन प्रचंड मोठं आहे. तसेच संसदीय राजकारणाचा त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. त्यामुळेही विरोधकांनी त्यांच्याकडे नेतृत्व दिल्याचं दिसून येतं.

सर्व पक्षांशी जवळकी

यंदाची राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची आहे. यूपीए आणि एनडीएच्या मतांमधील अंतर फारसं जास्त नाही. त्यामुळे यूपीएला जिंकण्याची आशा वाटत आहे. सत्ताधाऱ्यांची आणि तटस्थ पक्षांची मते खेचून आणायची असेल तर तिथे अनुभवी नेत्याची गरज आहे. शरद पवार यांना मानणार वर्ग केवळ विरोधी पक्षातच नाही तर सत्ताधारी पक्षातही आहे. सर्वच पक्षातील नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे पवारांनी पुढाकार घेतल्यास दोन्ही निवडणुकांचा निकाल वेगळा लागू शकतो, त्यामुळेही पवारांच्या नेतृत्वातच या निवडणुकीत एकटवायचं विरोधकांनी ठरवल्याचं सांगितलं जात आहे.