जगनमोहन रेड्डी : वडिलांचं मुख्यमंत्री असताना निधन ते पुन्हा सत्तेवर विराजमान

| Updated on: May 30, 2019 | 4:34 PM

विजयवाडा, आंध्र प्रदेश : वायएसआर काँग्रेस प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. वडील वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या अकाली निधनानंतर काँग्रेसकडून अपमान आणि बेहिशेबी संपत्तीप्रकरणी तुरुंगवास यासह अनेक चढउतार पाहणाऱ्या जगनमोहन रेड्डींनी अखेर मोठं यश मिळवलंय. एक छोटा उद्योगपती ते शक्तीशाली नेता हा प्रवास करताना जगनमोहन रेड्डींना विविध प्रसंगांना सामोरं जावं लागलं. […]

जगनमोहन रेड्डी : वडिलांचं मुख्यमंत्री असताना निधन ते पुन्हा सत्तेवर विराजमान
Follow us on

विजयवाडा, आंध्र प्रदेश : वायएसआर काँग्रेस प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. वडील वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या अकाली निधनानंतर काँग्रेसकडून अपमान आणि बेहिशेबी संपत्तीप्रकरणी तुरुंगवास यासह अनेक चढउतार पाहणाऱ्या जगनमोहन रेड्डींनी अखेर मोठं यश मिळवलंय. एक छोटा उद्योगपती ते शक्तीशाली नेता हा प्रवास करताना जगनमोहन रेड्डींना विविध प्रसंगांना सामोरं जावं लागलं. पण अखेर ज्या पक्षाने त्यांचा अपमान केला, त्या पक्षाचा राज्यातून सुपडासाफ करण्यात त्यांनी यश मिळवलंय.

वायएसआर काँग्रेसने आंध्र प्रदेशात 25 पैकी 22 जागा मिळवल्या आहेत. तेलंगणाच्या विभाजनानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झालेल्या चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपीचा त्यांनी दारुण पराभव केला. जगनमोहन रेड्डींनी कर्नाटकातून 1999-2000 साली एका कंपनीची स्थापना करुन व्यवसायात प्रगती केली. वडील वायएसआर 2004 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर ईशान्य भारतापर्यंत त्यांनी व्यवसाय वाढवला. सिमेंट यंत्र, मीडिया आणि निर्माण क्षेत्रात या व्यवसायाने हात पसरले.

वडिलांच्या निधनानंतर काँग्रेसकडून उपेक्षा

2004 मध्ये जगनमोहन रेड्डींनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण काँग्रेसकडून ही मागणी अमान्य करण्यात आली. यासाठी जगनमोहन रेड्डींना 2009 पर्यंतची प्रतीक्षा करावी लागली आणि ते कडप्पामधून खासदार झाले. पण 2009 मध्ये वडिलांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आणि आयुष्याला वेगळंच वळण मिळालं.

वडिलांच्या अकाली निधनानंतर मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी जगनमोहन रेड्डींनी काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. पण काँग्रेसने जगनमोहन रेड्डींची ही मागणी फेटाळली. रेड्डींनी याकडे अपमान म्हणून पाहिलं. धक्कादायक म्हणजे वडिलांची श्रद्धांजली यात्रा काढण्याची परवानगीही जगनमोहन रेड्डी यांना मिळाली नाही. यामुळे 177 पैकी 170 आमदारांनी जगनमोहन रेड्डींना पाठिंबा दिला. तरीही काँग्रेसकडून दुर्लक्ष करण्यात आलं आणि के. रोसैय्या यांना मुख्यमंत्री नेमण्यात आलं. या निर्णयावर जाहीर नाराजी व्यक्त करत जगनमोहन रेड्डींनी नव्या पक्षाची स्थापना केली.

2012 च्या पोटनिवडणुकीत आश्चर्यकारक निकाल

रेड्डी यांनी वडिलांच्या नावाने पक्ष काढल्यानंतर बूथ स्तरावर राजकीय संघर्ष सुरु केला. 18 आमदारांनी काँग्रेस सोडून वायएसआरमध्ये प्रवेश केल्यानंतर या जागांवर पोटनिवडणुका झाल्या. या जागांवर 2012 मध्ये पोटनिवडणुका झाल्या. या पोटनिवडणुकांमध्ये वायएसआर काँग्रेसने सर्वांना धक्का दिला. 18 पैकी 15 जागांवर वायएसआरने विजय मिळवला. यानंतर जगनमोहन रेड्डी यांच्यासाठी चंद्राबाबूंचा पक्ष टीडीपी प्रमुख विरोधी पक्ष ठरला. या काळात जगनमोहन रेड्डींना तुरुंगातही जावं लागलं.

2014 च्या पराभवानंतर संघर्ष

याच काळात 2014 मध्ये टीडीपीकडून वायएसआर काँग्रेसचा दारुण पराभव झाला. राजकीय गणित समजण्यासाठी रेड्डी यांनी 341 दिवसांची पदयात्रा काढली. पराभवाची कारणं समजणे आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी राज्यभर पायी फिरले. राज्यातील 134 विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी जवळपास दोन कोटी लोकांशी संवाद साधला. या यात्रेतूनच वायएसआर काँग्रेसने लोकांमध्ये जनसंपर्क प्रस्थापित केला आणि त्याची पावती या निवडणुकीत मिळाली. 175 जागा असलेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत वायएसआरने तब्बल 151 जागा मिळवल्या.

आंध्र प्रदेशात काँग्रेसचा सुपडासाफ

एकेकाळी आंध्र प्रदेशात सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या काँग्रेसचा जवळपास सुपडासाफ झालाय. या निवडणुकीत विधानसभेत काँग्रेसला केवळ 1.17 टक्के मते मिळाली. तर लोकसभेत एकही जागा जिंकता आली नाही.