छत्रपती शिवरायांचा उल्लेख केल्याने इतका राग का? जयंत पाटलांचा फडणवीसांना सवाल

| Updated on: Nov 30, 2019 | 4:02 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने आज 169 विरुद्ध शून्य मतांनी विश्वासदर्शक ठराव ( Uddhav Thackeray wins floor test ) जिंकला.

छत्रपती शिवरायांचा उल्लेख केल्याने इतका राग का? जयंत पाटलांचा फडणवीसांना सवाल
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने आज 169 विरुद्ध शून्य मतांनी विश्वासदर्शक ठराव ( Uddhav Thackeray wins floor test ) जिंकला. शिवेसना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांसह छोटे पक्ष, अपक्षांनी ठाकरे सरकारच्या ( Uddhav Thackeray wins floor test ) बाजूने मतदान केल्याने बहुमताचा 145 हा आकडा सहज पार झाला. हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे सर्व आक्षेप कायदा दाखवत फेटाळून लावले.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर बाजूचे आमदार एका बाजूला आणि विरोधातील आमदार दुसऱ्या बाजूला विभागणी करण्यात आली. त्यादरम्यान भाजपने गोंधळ घालत, सभात्याग केला.

उद्धव ठाकरे यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील आपलं निवेदन मांडलं.

जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीसांनी शिस्त पाळायला हवी होती, उद्धव ठाकरे आयुष्यात पहिल्यांदाच सभागृहात पाय ठेवत होते, त्यांचं स्वागत करणं अपेक्षित होतं, असं जयंत पाटील म्हणाले.

आयुष्यातील दैवताचा उल्लेख केला, खासकरुन छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला, तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या का राग आला? असा जयंत पाटील यांनी विचारला.

जयंत पाटील काय म्हणाले?

“विविध घटना घडल्या आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. समोरच्या बाजूने मात्र गोंधळ झाला. जाणीवपूर्वक गोंधळ करताना, या सभागृहात जे मंत्री आहेत, त्यांनी शपथ घेताना, जे टेक्स्ट आमच्या हातात होतं, त्या टेक्स्टचं वाचन केलं. एखादं चांगलं काम, आनंदाची घटना घडत असताना,  आपल्या आयुष्यातील दैवताचा उल्लेख केला, खासकरुन छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला, तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या का राग आला? हा प्रश्न आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं, शाहू महाराजांचं नाव घेतलं, महात्मा फुलेंचं नाव घेतलं, या महात्म्यांचं नाव घेताना, समोर देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या लोकांना का राग आला? या सर्वांच्या मनात महापुरुषांच्या मनात असूया का आहे? आज नाही तर पिढ्यानपिढ्या यांच्या मनात असूया आहे. तो राग त्यांच्यामधून बाहेर आला, याचं आम्हाला दु:ख वाटतंय

विरोधी पक्षनेता पण दर्जेदार असावा अशी आमची मागणी आहे. त्याने एक शिस्त पाळावी. उद्धव ठाकरे आज आयुष्यात पहिल्यांदा सभागृहात पाय ठेवत आहेत, त्यांचा सन्मान ठेवणं आवश्यक होतं. मतांची मोजणी होणार आहे, पण घोडेबाजाराला वाव दिला नाही त्यामुळे अध्यक्षांचं अभिनंदन.

असा घोडेबाजार 5 वर्षात या विधानसभेत घडणार नाही आपल्या आजच्या कृतीतून दाखवलं.

आतापर्यंत चुकीचं रेकॉर्डवर आणलं. प्रोटेम स्पीकर नेमण्याचा आणि तो रोज बदलण्याचा अधिकार मंत्रिमंडळाला आहे. जे मंत्रिमंडळ आलं त्याच्या प्रोटेम स्पीकरच्या नेमणुकीबद्दल वाद, शपथेबद्दल वाद.. आपल्या मनाला जे योग्य वाटत नाही, त्याबद्दल नियमानुसार बोलण्याचा अधिकार विरोधी पक्षाला आहे, पण सगळे नियम बाजूला ठेवून आज विरोधी बाजूने बोलण्यात आलं. माझी शंका आहे, देवेंद्र फडणवीस यांना विरोधीपक्षनेते होण्यासाठी स्पर्धा असावी, चंद्रकांत पाटील की देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता कोण, अशी स्पर्धा असावी, अजून विरोधीपक्षनेता नेमायचा आहे, त्यांना विचार करायला संधी द्या, 105 आमदारांना त्यांचे एकमत झाल्यानंतर त्यांचं मत लक्षात घ्या, असं जयंत पाटील म्हणाले.