अंबानी, अदानींसाठी कृषी कायदे, राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्याची पहिल्यांदाच उद्योगपतींच्या नावानं थेट टीका

| Updated on: Feb 02, 2021 | 7:44 PM

अंबानी, अदानी यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून शेतकरी कायदे करण्यात आले आहेत. तर आमच्या सरकारनं अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज काढून मदत केली, असा दावा जयंत पाटील यांनी केलाय.

अंबानी, अदानींसाठी कृषी कायदे, राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्याची पहिल्यांदाच उद्योगपतींच्या नावानं थेट टीका
Follow us on

नागपूर : राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता दोन महिन्यांपेक्षाही जास्त दिवस झाले आहेत. या आंदोलनावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय. अंबानी, अदानी यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून शेतकरी कायदे करण्यात आले आहेत. तर आमच्या सरकारनं अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज काढून मदत केली, असा दावा जयंत पाटील यांनी केलाय. नागपूरमधील काटोल ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आणि राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात पाटील बोलत होते. या कार्यक्रमाला गृहमंत्री अनिल देशमुखही उपस्थित होते.(Jayant Patil criticizes central government over farmers’ agitation)

जयंत पाटील यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद यात्रेची माहिती दिली. आम्ही गडचिरोलीपासून परिवार संवाद यात्रा सुरु केली आहे. त्यात आम्ही कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासोबत संवाद साधत आहोत. त्यांच्या मनात काय आहे? सरकारकडून त्यांच्या अपेक्षा काय आहेत? हे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं जयंत पाटील म्हणाले.

‘विदर्भातील नेत्याला राष्ट्रवादीत प्रथम स्थान’

राष्ट्रवादी काँग्रेस ज्या ठिकाणी निवडणूक लढवत नाही. त्या ठिकाणीही आमचे कार्यकर्ते पवार साहेबांच्या नावाने उपस्थित आहेत. आपण पराभूत झालो असलो तरी घाबरुन जाऊ नका, पुढच्या वेळी तुमचा विजय नक्की होईल, असा विश्वासही पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. अनिल देशमुख यांच्या विदर्भातील सिंचन प्रकल्पासंदर्भात मागण्या होत्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करु. कन्हान नदीवरील मोठा प्रकल्प आहे. त्याही पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पुढील काळात या प्रकल्पाचं काम गती घेईल, असं आश्वासनही यावेळी पाटील यांनी दिलं आहे. काटोल मतदारसंघातील नेत्याला पवार साहेबांनी सरकारमध्ये गृहमंत्री बनवलं. विदर्भातील नेत्यालाही राष्ट्रवादीत प्रथम स्थान आहे हेच यातून दाखवून दिल्याचं पाटील म्हणाले.

जयंत पाटलांचा काँग्रेसला टोला

पालिका निडवणुकीतील आघाडीवरून जयंत पाटलांना विचारलं असता त्यांनी काँग्रेसला टोले लगावले. आघाडीच्या माध्यमातूनच पालिकेची निवडणूक लढवली जावी अशी आमची मागणी आहे. महाविकास आघाडीतील मित्रांशी बोलून त्याबाबत निर्णय घेतला जाईल. पण आमचाच पक्ष मोठा असं म्हटलं तर अडचणी येऊ शकतात, असा टोला पाटील यांनी काँग्रेसला लगावला. नागपूर महानगरपालिका निवडणुकीत आघाडी करुन लढायचे की स्वबळावर लढायचे याचा निर्णय स्थानिक पातळीवरील नेत्यांना विश्वासात घेऊन घेतला जाईल. यावेळी सर्व पक्षांनी एकत्रित ताकद लावली तर नागपूर जिल्हा परिषदेप्रमाणे नागपूर महानगरपालिकेत देखील परिवर्तन होऊ शकतं, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या :

या देशात लोकशाही जिवंत आहे का?; शिवसेनेचा संताप; शेतकरी आंदोलकांशी चर्चा

सगळ्यांनाच राज ठाकरे होता येत नाही; मनसेच्या आऊटगोईंगवर बाळा नांदगावकरांची सूचक प्रतिक्रिया

Jayant Patil criticizes central government over farmers’ agitation