‘फ्री काश्मीर’च्या पोस्टरवरुन देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटलांचं ट्विटरवॉर

| Updated on: Jan 07, 2020 | 12:13 PM

तुमच्यासारखे जबाबदार नेते शब्दांचे भलते अर्थ लावून जनतेची दिशाभूल कशी करु शकतात, असा प्रश्न आपल्याला पडत असल्याचं जयंत पाटील म्हणाले.

फ्री काश्मीरच्या पोस्टरवरुन देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटलांचं ट्विटरवॉर
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या नाकाखाली लागणारे ‘फ्री काश्मीर’चे फलक कसे खपवून घेतात? असा सवाल करणारे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. तुमच्यासारखे जबाबदार नेते शब्दांचे भलते अर्थ लावून जनतेची दिशाभूल कशी करु शकतात, असा प्रश्न आपल्याला पडत असल्याचं जयंत पाटील (Jayant Patil to Devendra Fadnavis) म्हणाले. त्यानंतर दोघांमध्ये ट्विटरवॉर रंगला.

‘देवेंद्रजी, ‘काश्मीर मुक्त करा’ याचा अर्थ काश्मीर भेदभावापासून, नेटवर्कवरील बंदीपासून आणि केंद्रीय अंकुशापासून मुक्त करा. तुमच्यासारखे जबाबदार नेते शब्दांचे भलते अर्थ लावून तिरस्कार निर्माण करत आहेत, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, यावर माझा विश्वासच बसत नाही. सत्ता गमावल्यामुळे हे होत आहे की तुम्ही आत्मनिग्रह हरवून बसला आहात?’ असा प्रतिप्रश्न जयंत पाटलांनी केला.

जयंत पाटलांच्या ट्वीटला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. ‘तुमची दया येते! आता फुटीरतावादी वृत्तीला सरकारी वकील मिळाला. जयंतराव, हे वोट बँकेचं राजकारण तुमच्याकडून अपेक्षित नाही. काश्मीर आधीच भेदभावापासून मुक्त आहे. फक्त सुरक्षेच्या कारणास्तव काही दशकांपासून निर्बंध आहेत. सरकारमध्ये असो किंवा विरोधीपक्षात, आमचं एकच तत्त्व ‘राष्ट्र सर्वप्रथम’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचाराविरोधात मुंबईत मोठ्या प्रमाणात निदर्शनं सुरु आहेत. यामधील एक पोस्टर सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टरवर ‘FREE KASHMIR (फ्री काश्मीर)’ असं लिहिलं होतं.

या पोस्टरचा भाजपच नाही, तर काँग्रेस नेत्यांनीही निषेध केला आहे. राजकीय नेत्यांसह सिनेसृष्टीतील कलाकारांनीही या पोस्टरवर आक्षेप घेतला आहे. जेएनयू हिंसाचाराविरोधातील आंदोलनात असे पोस्टर कशाला? असा सवाल अनेक जणांनी उपस्थित केला आहे.

धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरुन खडाजंगी, उद्धव ठाकरेंच्या मदतीला छगन भुजबळ

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेचा फोटो रिट्वीट करत लिहिलं, “हे आंदोलन नक्की कुणासाठी आहे? ‘फ्री काश्मीर’च्या घोषणा इथे का दिल्या जात आहेत? मुंबईत अशा प्रकारच्या फुटीरतावादी घटकांना आपण कसं सहन करु शकतो? मुख्यमंत्री कार्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आझादी गटाकडून ‘फ्री काश्मीर’च्या घोषणा कशा दिल्या जातात? उद्धवजी तुमच्या नाकाखाली अशाप्रकारे फ्री काश्मीरची भारतविरोधी मोहीम सुरु आहे, हे तुम्ही खपवून घेणार का?” असा प्रश्न फडणवीसांनी विचारला होता.

मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियासमोर रविवार रात्रीपासून जेएनयू हिंसाचाराविरोधात आंदोनल सुरु आहे. यामध्ये विद्यार्थी, कलाकार आणि सामान्य नागरिक जेएनयू हिंसाचाराविरोधात एकवटले आहेत. दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. आंदोलनादरम्यान सोमवार संध्याकाळी एक मुलगी हातात ‘फ्री काश्मीर’ असं लिहिलेलं पोस्टर घेऊन उभी होती. हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी टीका केली. (Jayant Patil to Devendra Fadnavis)

याआधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथविधीनंतर घेतलेल्या कॅबिनेट बैठकीनंतर पत्रकार परिषदेत धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरुन चांगलीच खडाजंगी झाली होती. त्यानंतर तात्काळ राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या मदतीला धावून आल्याचं दिसलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेते, विशेषतः राष्ट्रवादीचे नेते जाहीरपणे मुख्यमंत्र्यांची बाजू सावरुन घेताना दिसत आहेत.