Jharkhand Elections : भाजपच्या मुख्यमंत्र्यासमोर बंडखोराचं आव्हान, नितीश कुमार प्रचाराच्या रिंगणात?

| Updated on: Nov 19, 2019 | 11:34 PM

झारखंडच्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून (BJP) तिकीट न मिळाल्याने नाराज असलेल्या सरयू राय मुख्यमंत्री रघुबर दास यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Jharkhand Elections : भाजपच्या मुख्यमंत्र्यासमोर बंडखोराचं आव्हान, नितीश कुमार प्रचाराच्या रिंगणात?
Follow us on

नवी दिल्‍ली : भाजपसोबत युतीकरुन महाराष्‍ट्र विधानसभा निवडणुका लढलेली शिवसेना आता काँग्रेस-एनसीपीसोबत आघाडी करण्याच्या तयारीत आहे (Maharashtra Political Crisis). तर दुसरीकडे, एनडीएचा मित्रपक्ष लोक जनशक्ती पक्षाचे (लोजपा) नेते चिराग पासवान हे बंडखोरी करण्याची शक्यता आहे. भाजप या दोन्ही समस्यांना तोंड देतेच आहे, तितक्यात त्यांच्यासमोर आणखी एक संकट येऊन उभं ठाकलं आहे. झारखंडच्या निवडणुकांमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजप बंडोखाराला पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे.

झारखंडच्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून (BJP) तिकीट न मिळाल्याने नाराज असलेल्या सरयू राय यांनी थेट मुख्यमंत्री रघुबर दास यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे (Jharkhand Election 2019). सरयू राय यांनी अपक्ष उमेदवार म्हणून झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे (Jharkhand Election 2019). सरयू राय हे काही दिवसांआधीपर्यंत रघुबर दास यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. मात्र, भाजपने या निवडणुकीत उमेदवारी न दिल्याने त्यांनी बंडखोरी करत थेट मुख्यमंत्र्यांविरोधातच दंड थोपटले आहेत.

इतकंच नाही, तर झारखंड मुक्ती मोर्चासोबतच जेडीयूनेही त्यांना पाठिंबा देण्याचं आश्वासन दिल्याचा दावा सरयू राय यांनी केला. तसेच, गरज पडल्यास बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार जमशेदपूरला त्यांच्या प्रचारासाठी येतील असंही सरयू राय यांनी सांगितलं.

नितीश कुमार आणि सरयू राय यांच्यातील वाढत्या संबंधांमुळे भाजपने त्यांना तिकीट नाकारलं, अशी चर्चा सध्या बिहार-झारखंडच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. दुसरीकडे, नितीश कुमार यांनी त्यांच्या उमेदवारांना जमशेदपूर पूर्व आणि पश्चिम मतदारसंघात सरयू राय यांचा प्रचार करण्याचे आदेश दिल्याचाही माहिती आहे. त्यामुळे सध्या भाजपला झारखंडमध्ये अंतर्गत बंडखोरीला तोंड द्यावं लागत आहे.

सरयू राय हे सुशील कुमार मोदीचे निकटवर्तीय मानले जातात, ते बिहारमधील भाजपचे बडे नेते आहेत. त्यामुळे भाजपने सरयू राय यांच्या मतदारसंघातील निवडणूक प्रचारापासून सुशील मोदी यांनाही वेगळं ठेवलं आहे.

अशा परिस्थितीत नितीश कुमार हे उघडपणे भाजपाच्या बंडखोराला पाठिंबा देतात. तेही अशा नेत्याला जो थेट मुख्यमंत्र्यांविरोधात रिंगणात उतरला आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. सध्याच्या घडामोडींकडे बिहार विधानसभा निवडणूक 2020 मध्ये एनडीएला वाचवणे भाजपासाठी मोठे आव्हान ठरु शकते.