जेपी नड्डांच्या कार्यक्रमाला उदयनराजेंची दांडी, भाजपवर नाराजी?

| Updated on: Sep 23, 2019 | 9:37 PM

विधानसभेसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर न झाल्याने कदाचित राजे नाराज असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उदयनराजे दिवसभर साताऱ्यातच असूनही कार्यक्रमाला न आल्याचीही माहिती आहे.

जेपी नड्डांच्या कार्यक्रमाला उदयनराजेंची दांडी, भाजपवर नाराजी?
Follow us on

पुणे : भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विजय संकल्प मेळाव्याला राष्ट्रवादीतून भाजपात आलेले माजी खासदार उदयनराजे भोसले (Pune Udayanraje Bhosale) यांनी दांडी मारली. भाजपचे कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीतील मेळाव्याला उदयनराजे भोसले (Pune Udayanraje Bhosale) गैरहजर होते. विधानसभेसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर न झाल्याने कदाचित राजे नाराज असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उदयनराजे दिवसभर साताऱ्यातच असूनही कार्यक्रमाला न आल्याचीही माहिती आहे.

पुण्यात झालेल्या मेळाव्याला पश्चिम महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, खासदार अमर साबळे, हर्षवर्धन पाटील शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह सर्व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. पण उदयनराजेंनी मात्र याकडे पाठ फिरवली.

उदयनराजेंचा भाजप प्रवेश

उदयनराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि दुसऱ्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच व्हावी ही उदयनराजेंची अट होती. पण विधानसभा निवडणूक जाहीर होऊनही पोटनिवडणूक जाहीर झालेली नाही.

जेपी नड्डांची राष्ट्रवादीवर टीका

काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांनी घराणेशाही जोपासली. या पक्षात नातेवाईकांचा भरणा असून ते कौटुंबीक पक्ष झालेत. मात्र भाजप घराणेशाहीचं राजकारण करत नसल्याचा दावा भाजप कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांनी केला. काँग्रेस-राष्ट्रवादीतील अर्धे नेते जेलची वारी करून आलेत, तर काहीजण बेलवर आहेत. अनेक जण जेलच्या दारावर आहे. कोणाची सीबीआय, तर कोणाची ईडी चौकशी सुरू असल्याचा आरोप नड्डांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात जगात भारताची प्रतिमा बदलली आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रतिमा बदलली. त्यामुळे पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार आणायचं, असं आवाहन नड्डा यांनी केलं.

जेपी नड्डा यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. भाजपाने केंद्रात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे केल्याचा दावा त्यांनी केला. राष्ट्रभक्ती आणि एकतेची ही लढाई आहे. समाजाने देश मजबूत करायचा आहे. भारताने जगात आपलं वर्चस्व सिद्ध केल्याचंही त्यांनी म्हटलं.

“फडणवीसांनी राज्याचा चेहरामोहरा बदलला”

कलम 370 कलम हटवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छाशक्ती आणि गृहमंत्री अमित शाह यांची रणनीती निर्णायक ठरली. यामुळे जम्मू आणि श्रीनगरमधील नागरिकसुद्धा खुश असल्याचा दावा त्यांनी केला. यामुळे इथल्या विवाहित महिलांनाही संपत्तीत हक्क मिळणार आहे. त्याचबरोबर इथला सर्वांगीण विकास होणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा चेहरामोहरा बदलला. पूर्वी राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू होता. सलग पाच वर्ष सरकार सुद्धा चालवणं अशक्य झालं होतं. एकमेकांचे पाय ओढले जात होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिमा बदलल्याचा दावा नड्डांनी केला. राज्यात शिक्षणात प्रगती झाली, पाणी, पायाभूत सुविधा यांचा विकास झाला. मेट्रो, रस्ते, सर्व क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचा दावा नड्डा यांनी केला.